Posted on

नागराज मंजुळे यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक वाचलंच पाहिजे राव

0

माध्यमान्तराचा अभ्यासयुक्त धांडोळा

डॉ. प्रकाश शेवाळे

“साहित्यकृतीचे माध्यमांतर” ही अतिशय महत्वाची व निरंतर चालणारी यंत्राधिष्ठित प्रक्रिया आहे. साहित्यकृतीच्या माध्यमांतराची बीजे त्या त्या साहित्यकृतीच्या आशय, कथनशैली व दृश्यात्मकतेमध्ये असतात. साहित्यकृतीचे माध्यमांतर हा विविधांगी दृष्टिकोनातून आजच्या काळातील अतिशय महत्वाचा व कलावंतांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. संशोधनाचे व समीक्षेचे विविध परिप्रेक्ष्य माध्यमांतराच्या अभ्यासातून निर्माण झाले आहेत व आज निर्माण होत असतांना आपणास दिसतात. साहित्य व माध्यमांचा आंतरविद्याशाखीय अभ्यास समतोल व सखोल समीक्षेसाठी आवश्यक आहे आणि नेमका ह्याच महत्वाच्या व उपयुक्त अशा विषयावर डॉ. राजेंद्र थोरात यांनी “साहित्यकृतीचे माध्यमांतर” या ग्रंथाचे संपादन नुकतेच प्रकाशित केले.

जब्बार पटेल या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अर्पण केलेल्या या ग्रंथाला प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभली आहे. माध्यमांतराची प्रक्रिया मंजुळे Continue reading नागराज मंजुळे यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक वाचलंच पाहिजे राव

0
Posted on

राजीव खांडेकर लिखित ‘हार्ट टू हार्ट’बाबत- प्रवीण दाभोळकर

0

राजीव खांडेकर सरांचं “हार्ट टू हार्ट” पुस्तक परवा लायब्ररीत दिसलं. त्यांनी घेतलेल्या मुलाखती लोकसत्ता मध्ये “हार्ट टू हार्ट” कॉलम ने त्यावेळी यायच्या..त्याच हे पुढे जाऊन पुस्तक झालं. साधारण २८ जणांच्या यात मुलाखती आहेत.

ठरविक प्रश्न आणि त्याची उत्तर अस मुलाखतीच एक सर्वसाधारण स्वरूप आपल्या डोक्यात फिट्ट असत. किंवा मुलाखत सुरू असताना मुद्दे काढून ठेवायचे नंतर त्या मुद्द्यांवरून मुलाखत लिहायची अस आपण करतो. पण मुलाखत घेताना कोणत्याही नोट्स न काढता एखाद्याशी निवांत गप्पा मारायच्या आणि नंतर त्याच व्यक्ती चित्र शब्दातून उभं करायचं हे अशी मुलाखत घेण्याची राजीव सरांची स्टाईल.
सुरेश प्रभू, आशुतोष गोवारीकर, सुप्रिया सुळे, निळूभाऊ फुले, वामनराव पै, रामदास पाध्ये, लोकशाहीर विठ्ठल उमप आशा अनेकांचा प्रवास यातून नव्याने कळतो.

साधारण १५ वर्षापूर्वीच हे पुस्तक असावं. कारण कालानुरूप काही संदर्भही आता बदलत गेलेयत.
मायक्रोबायोलॉजीतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या खा. सुप्रिया ताईं तेव्हा “लर्निंग डीसॅबिलिटी” विषयावर आणि यशवंत राव चव्हाण प्रतिष्ठाच्या माध्यमातून काम करीत होत्या. “डायनिंग टेबलवर बसून राजकारणावर चर्चा करणे एक मर्यादेपर्यंत ठीक वाटते, त्यांनतर मला तेही फारसे आवडत नाहीत” असे सुप्रिया ताईंचे त्यावेळचे वाक्य होते. आज प्रभावी खासदार म्हणून राजकारणात सक्रिय आहेत.

अभ्यासू, कल्पक, ध्येयवेडे असे सुरेश प्रभू मात्र याला अपवाद ठरतात. प्रभू आणखी १० वर्षांनी आता इतकेच प्रभावी असतील का? की जाती धर्माच्या राजकारणाला कंटाळून ते बाहेर पडतील? ते या वातावरणात कितपत टिकतील अशी शंका मुलाखती नंतर व्यक्त केली होती. काही महिन्यांपूर्वी रेल्वे मंत्री असलेले प्रभू मुलाखत घेतली तेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या औद्योगिक परिषदेवर वरिष्ठ सल्लागार होते.

निळू भाऊ, वामनराव पै आणि विठ्ठल उमप यांच्याशी झालेले “हार्ट टू हार्ट” पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे आहे.
खलनायक म्हणूनच परिचित झालेल्या निळूभाऊंना अपमानास्पद प्रसंगांना सामोरे जावे लागलं. कधी कुठे घरातही प्रवेश नाकारण्यात आला तर कधी शिव्याही पडल्या.

जांभूळ आख्यान पाहताना कर्णावर जीव ओवाळून टाकणारी द्रौपदीच साक्षात विठ्ठल उमप यांच्याजागी दिसायची. वयाच्या ७५ नंतरही हा जोश कुठून येतो यावर त्यांच ठरलेलं उत्तर ते द्यायचे.

लोकांच्या भीती, दुःखाचा फायदा घेणाऱ्या बुवाबाजीच्या काळात “कोणी साधू किंवा संत नाही, जीवनविद्या मार्गदर्शक” अशी ओळख झालेले तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार असे सांगणारे वामनराव पै. यांचा मंत्रालयाच्या नोकरीपासून ते ‘जीवनविद्या’ पर्यंतचा प्रवासही जाणून घेण्यासारखा आहे.
अजून खूप जणांच्या त्यावेळच्या कथा उलगडत जातील. सई परांजपे, अमोल पालेकर, अतुल कुलकर्णी, पैलवान मारुती माने असे अनेक.
#हार्टटूहार्ट #राजीवखांडेकर

भाग २ लवकरच…

-#प्रविणदाभोळकर

0
Posted on

‘जू’ आईच्या संघर्ष-संस्कारांची गाथा- प्रा.बी.एन.चौधरी

0

||सोन्याचा सर्वा||

माझी ७५ वर्षाची आई काळजीने मला म्हणाली
“नाना? अरे कितलं वाचस. डोयास्नं तेज जाई नं भो,
असं एकसारखं वाचशी तं.”
मी म्हणालो, “माडी, तेज जानार नही,
उलट नवी दृष्टी भेटी ऱ्हायनी माले,
हाई पुस्तक वाचिसन. हाई पुस्तक नही. आरसा से.
येम्हा चेहरा दिखस आपला सोताना!”

आई म्हणाली, “काय शे रे भो येम्हा इतलं आरसासारखं निथ्थय, निर्मय.”
मी आईला ‘जू’विषयी थोडक्यात सांगितलं.
आईनं चक्क पंधरा दिवसात “जू” वाचून संपवलं अन प्रतिक्रीया दिली,
“नाना, हाई तं बावनकशी सोनं शे रे भो. धगधगती भट्टीम्हा ताई-सुलाखीसन निंघेल शेत
या भावड्या आनी तेनी माय, बहिणी. कितलं सोसं बिचारास्नी.
पन हिंमत नही हारी. येले म्हनतंस जगनं.
एक नवं जगच उभारं त्या माऊलींनी कष्ट करीसन. ”

हा मायलेकातला संवाद
प्रसिद्ध कवी आणि कथाकार प्रा. बी. एन. चौधरी
आणि त्यांची माउली यांच्यातील आहे!
खरंतर हा संवाद नाहीच
हा सोन्याचा सर्वा आहे माझ्यासाठी
या माउलीच्या तोंडून निघालेला एक एक शब्द
म्हणजे ‘जू’ ची झालेली उत्कृष्ट समीक्षा.
त्या माउलीला चरणस्पर्श करत
आपल्या समोर ठेवतो आहे
हा सोन्याचा सर्वा.

||‘जू’ आईच्या संघर्ष-संस्कारांची गाथा- प्रा.बी.एन.चौधरी||

सर्वत्र गाजत असलेलं आणि वाचायलाच हवं अशी मनात उर्मी दाटून आलेली असतांना अचानक एक दिवस पोस्टमन दादांनी एक पार्सल आणून दिलं. माझे सन्मित्र विजय पाटील यांच्या स्नेहाग्रहाने थेट लेखक ऐश्वर्य पाटेकर यांचे कडूनच मला “जू” ची अविस्मरणीय भेट मिळाली. एकदाच नव्हे तर दोन, तीनदा मी “जू” अघाश्यासारखं वाचून काढलं. माझं ते रात्रंदिवसाचं वाचन पाहून माझी ७५ वर्षाची आई काळजीने मला म्हणाली “नाना? अरे कितलं वाचस. डोयास्नं तेज जाई नं भो, असं एकसारखं वाचशी तं.” आम्ही घरात आहिराणी भाषा बोलतो. मी म्हणालो….. “माडी, तेज जानार नही, उलट नवी दृष्टी भेटी -हायनी माले, हाई पुस्तक वाचिसन. हाई पुस्तक नही. आरसा से. येम्हा चेहरा दिखस आपला सोताना.” आई म्हणाली “काय शे रे भो येम्हा इतलं आरसासारखं निथ्थय, निर्मय.” मी आईला “जू” विषयी थोडक्यात सांगितलं. तिचीही उत्सुकता चाळवली आणि आईनं चक्क पंधरा दिवसात “जू” वाचून संपवलं. संपूर्ण वाचन झाल्यावर तिची प्रतिक्रीया होती “नाना, हाई तं बावनकशी सोनं शे रे भो. धगधगती भट्टीम्हा ताई-सुलाखीसन निंघेल शेत या भावड्या आनी तेनी माय, बहिणी. कितलं सोसं बिचारास्नी. पन हिंमत नही हारी. येले म्हनतंस जगनं. एक नवं जगच उभारं त्या माऊलींनी कष्ट करीसन. ” माझ्या आईची ही प्रतिक्रियाच मला “जू” चं वास्तव अस्तित्व अधोरेखित करणारी समिक्षा वाटली.


समाजात संकटं आली म्हणजे माणसं हतबल होतात. पुरुषच नव्हे तर स्त्रीयांही स्वतःचा प्राण त्यागतात. छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःसह लेकरांचाही जीव घेतात. अशी नकारात्मक, निराशावादी परीस्थिती असतांना एक आई संकटांचा निकराने मुकाबला करते. स्वतः जगते. आपल्या लेकरांना जगवते. त्यांना मृत्यूच्या दारातून परत आणते. हे संकट नैसर्गिक, परक्यांनी दिलेलं नसतं तर आपल्या माणसांनी दिलेलं असतं. ज्यांनी जीव वाचवावा तेच जीवावर उठले तर कुणाला सांगायचं अशी परीस्थिती असतांना आई ही कधीही अबला, परावलंबी, हताश, हतबल नसते हे सिध्द करणारी कहाणी म्हणजे ऐश्वर्य पाटेकर याचे “जू” आहे. “जू ” जगण्याचं शास्त्र आहे. लढण्याचा मंत्र आहे, नातं टिकवण्याचं तंत्र आहे. आई प्रसंगी रणरागिणीचे रुप धारण करते तर कधी ती माया, ममतेची करुणा मूर्ती होते. अशी अनेक रुपे यात दिसून येतात.

मी अनेक आत्मकथनं वाचली आहेत. त्यातली बरीचशी मला रंजक, कलात्मक, मढवलेली, सजवलेली वाटली. मात्र, “जू” मला अकृत्रिम, प्रामाणिक आणि पारदर्शी वाटलं. जसं घडलं तसंच मांडलंय असं वाटलं. अनेकांनी अत्मकथनं लिहिली ती त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात. आयुष्याच्या शेवटच्या पडावावर. यात स्वतःच्या महिमामंडनाचा मोहही अनेकांना टाळता आला नाही. मात्र, ऐश्वर्य पाटेकर यांनी आपल्या ऐन उमेदीच्या काळात “जू” लिहून स्वतःच्या जगण्याचं डोळस मूल्यमापन केलं आहे. अवघ्या पंधरा वर्षाचा कालावधी. मात्र, तो जिवंत करुन समोर मांडतो. हे मांडताना कुठेही स्वतःचं अवास्तव महत्त्व वाढवून घेतलेलं नाही. वरवर ही भावड्याची आत्मकथा वाटत असली तरी ती ख-या अर्थाने भावड्याच्या आईच्या जगण्याच्या संघर्षाची गोष्ट आहे. गोष्ट कसली ? हा तर एक जीवघेणा प्रवास आहे जगणं आणि मरण यातला. यातला प्रत्येक प्रसंग, घटना इतकी जोरकसपणे मांडली गेली आहे की त्याआपल्या आसपास घडत आहेत असा सतत आपल्याला भास होतो. ते इतके अकल्पित, वेदनादायी आहेत की ते आपल्याला अंतर्बाह्य हादरवून सोडतात. भावड्या हा “जू”चा सूत्रधार असून तो एका विशाल पटाला वाचकांसमोर उलगडत जातो.

“जू”ची सुरवातच आईने गायलेल्या एका ओवीने होते. चार माझ्या लेकी/ चार गावच्या बारवा/अन् माझा गं लेक बाई/ मध्ये हिरवा जोंधळा. या ओवीतच आई, भावड्या आणि त्याच्या चार बहिणी समोर उभे ठाकतात. पाटेगांवच्या इंदूबाई आणि नामदेव या दाम्पत्याला चार मुली आणि एक लेक. एकापाठोपाठ तीन मुली होतात इथून सुरवात होते आईच्या अवहेलना, दुःख आणि कष्टाची. नवरा, सासू, सासरा, नणंद सारे मिळून तिला छळतात. जगणं कठिण करतात. घरातून परागंदा करतात. ती माहेराला जवळ करते. येथे भाऊ प्रेमळ असला तरी भावजया दावेदार होतात. आई स्वाभिमान, जिद्द सांभाळत सासरी परतते. स्वतःचं घर उभं करते. घायाळ पक्षिणी आपल्या पिलांना पंखांखाली घेत त्यांचं संरक्षण करते तशी आई लेकरांची ढाल बनते. एकीकडे नवऱ्याची क्रूर, उलट्या काळजाची राक्षसी वृत्ती तर दुसरीकडे आईचं सोशीक, लढाऊ, संस्कारी, सोज्वळ नंदादीपासारखं तेवणं. मुलगा होत नाही,आवडत नाही असं म्हणून नवरा सवत आणतो.नातेवाईक जमिन हडपण्याचा प्रयत्न करतात. तरी ही माऊली संकटांना घाबरत नाही. धीराने उभी राहते. समोर संकटांचा पहाड, वेदनांची रास मांडलेली असतांना ती लेकरांमध्ये सकारात्मकतेची उर्जा पेरते. दु:खाच्या बाजारात द:खाच्या विरोधात लढण्याचं बळ एकवटते. त्या लढ्याची ही सकारात्मक गोष्ट आहे.

घरात वणवा पेटलेला असतांना सर्वबहिणींची मदार भावड्यावर एकवटलेली. तो मोठा होईल? शिकेल? साहेब होईल? आईचे दिवस पालटतील हेच त्यांच्या इवल्या डोळ्यातलं भव्य स्वप्न. भूक, संघर्ष आणि आकांशाच्या वाटेवर भावड्याला सोबत करते ती कविता. ती त्याची उपजत सोबती. हीच कविता त्याला बळ देते. त्याला शाळेत, शिक्षकात, नातेवाईक, समाजात मान मिळवून देते. त्याचा बापाला मात्र याचं कौतुक नाही. उलट सावत्र आई सोबत तो त्याच्या जीवावर उठतो. नशिब बलवत्तर म्हणून यातून तो वाचतो. या साऱ्यात माय त्याच्या पाठी सावलीसारखी उभी राहते. संस्कारांचं रोपण करते. नात्यातली नकारात्मकता, भय घालवण्यासाठी ती जगणं फुलवते. आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतून आदर्श उभा करते. संकटकाळी? कठीण समयीही ती निश्चयापासून ढळत नाही. तीच्या मुखातून निघालेली वाक्य विद्यापीठीय पुस्तकांपेक्षा मोलाची वाटतात. तिच्या पायाला पडलेल्या भागांना भावड्या रात्री मलम लावतो. तेव्हा ती म्हणते “लेका, दून्यातल्या समद्या क्रिमा घेवून आला तरी त्या माझ्या भेगायपुढे हरतील. भेगामातूर हरनार नाही. त्या लढतच राहतील….. पाय रक्तबंबाळ करत !” यातून तिच्या कष्टाची व जिद्दीची व संकटांना भिडण्याची कल्पना येते. ती हार मानायला तयार नाही. स्वतःचं मुल्य तिला माहित आहे व पुढे बरे दिवस येतील हे ही तिला माहित आहे. ती म्हणते “लेका, उकिरड्याची दैनाबी एकना एक दिवस फिटतेच. तशी ती आपलीबी फिटेन. यातून तिचा दुर्दम्य आशावाद दिसून येतो. बाजारात एका म्हातारीच्या तोंडी आलेलं वाक्य ” गरीबाची इज्जत रस्त्यावर पडलेली असते, ती कुणीही तुडवून जाते.” यातून गरिबांची आगतिकता व असहायता व्यक्त होते. एका ठिकाणी आई म्हणते “चांगली माणसं जोडण्यासाठी अंतःकरणाला डोळे हवेत.” यातून माणसाला अंतरकरणाची भाषा अवगत असावी असं तिला वाटतं. हे संकटांनी भरलेलं जीवन सुसह्य कसं झालं हे सांगतांना भावड्या म्हणतो “आम्ही भावंड जशी एक भाकर सर्वात वाटून खायला शिकलो तसंच खांद्यावर लागलेल्या जू चा भारही वाटून घ्यायला शिकलो.” यातून त्यांची नात्यांची घट्ट वीण व एकमेकांप्रती असलेली सह- संवेदना दिसून येते. अशी साधी, सोपी, सुटसुटीत वाक्ये ही “जू” ची बलस्थाने आहेत. भाषा हे या आत्मकथेचं आभुषण आहे. लासलगाव-चांदवड परिसरातील बोलीभाषा व तिचे शब्द, वाक्प्रचार, म्हणी, लोकगीते यांच्या चपखल वापराने “जू”चं सौंदर्य अधिक खुलून आलं आहे. ते तिच्या अनघड स्वाभाविक स्वरुपात प्रकटले आहे.

यातील काही प्रसंग तर काळजाचा ठाव घेतात. घरगाडा ओढतांना कराव्या लागणाऱ्या कसरतीत आई लासलगावच्या कांद्याच्या खळ्यावर रात्रपाळीचं काम स्विकारते. दूधपिता भावड्या घरी असतो. रात्रीचे अकरा वाजतात. आईचा पान्हा दाटून येतो. ती तशीच काम सोडून लेकासाठी अंधारात घराची वाट धरते. आणि वाट चुकते. पहाटेचे पाच वाजतात. आणि मग घर दिसतं. मायचा उमाळा फुटून निघतो. या प्रसंगात आईची माया मला लेकरासाठी गडाचा बुरुज उतरुन जाणाऱ्या हिरकणीपेक्षा तसूभरही कमी वाटत नाही. एका प्रसंगात भावड्याचा बाप दुसऱ्या बायकोला झालेल्या मुलाचा नवस फेडण्यासाठी भावड्या आणि त्याच्या बहिणींचा लाडका बोकड खाटकासारखा फरफटत ओढून नेतो. तेव्हाचा त्या भावंडांचा आक्रोश वाचकांच्या काळजाला घरे पाडतो. भावड्याची आई अनेक संकटं येतात तेव्हा मनाने खचत नाही तुटत नाही. तीच आई तिची पाळलेली शेळी जेव्हा कुत्री फाडून खातात तेव्हा आंतर्बाह्य हादरून जाते. आपलं सर्वस्व हरवलय अशी तिची व्याकूळता आपल्यालाही आतून हलवून सोडते. हे प्रसंग म्हणजे मानवी भावभावनांचे अत्युच्च दर्शन आहे असे मला वाटते. अश्या प्रसंगांनी “जू” वाचकाला आपलीच कथा वाटते. आणि ती लेखक-वाचकादरम्यान एक अदृष्य बंध निर्माण करते.

“जू” मध्ये पात्रांचा मोठा गोतावळा आहे. भावड्याचं घर, परीसर, गावातील माणसं अशी किमान पन्नासेक माणसं आपणास भेटतात. तरीही त्यांचा गुंता होत नाही हे लेखकाचं यश आहे. इंदूबाई, नामदेव, भावड्या, अक्का, माई, तावडी, पमी, सर्व मेहुणे, आजी, आजोबा, आत्या, फुवा, सावत्र आई, काका, भाऊबंद, भावड्याचे मित्र संतू, पंग्या, गण्या, दिवड्या. गावातील शांताबाई, दुर्गावहिनी, सीतावहिनी, तानाई, जिजामावशी, कौसाई, राधा, वच्छिआक्का, चंद्रभागा, केरसुणी आजी, वेणूआत्या, भोकरडोळ्या अश्या अनेकांशी आपली भेट होते आणि ते मनात घर करुन राहतात.

“जू” चं वैशिष्ट्य असं आहे की ते दुःख उकळत बसत नाही दुःखावर फुंकर घालते. संकटांचा बाऊ करत नाही. संकटांना भिडायला आणि लढायला शिकवते. वेदना मिरवायला नाही तर त्या आतल्या आत जिरवायला शिकवते. हे मांडताना कुठेही कृत्रिमता दिसत नाही. दिसतं ते प्रासादिक हळवंपण. प्रसंगोत्पात निरागसता झळकते. यातल्या शब्दाशब्दांना कष्टातून, श्रमातून आलेल्या घामाचा सुगंध आहे. तो वाचकाला धुंद करतो. लेखक स्वतः एक कवी असल्याने लिखाणातून वेळोवेळी एक निखळ काव्यात्मकता झळकते. “जू” ला पाठबळ देतांना आदरणीय द.ता.भोसले म्हणतात की या लिखाणाला आत्मबळाचे कोंदण आहे. संपत्तीबळ, शस्त्रबळ, शब्दबळ हे अशाश्वत असतात मात्र, आत्मबळ हे श्रेष्ठ व शाश्वत असते. आत्मबळाचे कोंदण असल्यामुळेच हे लिखाण वाचतांना मन हेलावतं, हृदय पिळवटून निघतं आणि काळजाला भेगा पडतात.

ऐश्वर्य पाटेकर हे कवी म्हणून सिध्द झाले आहेत. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. मात्र, त्यांचे हे लिखाण दु:खाच्या प्रदर्शनासाठी अथवा पुरस्कारासाठी केलेलं लिखाण नाही. हे लिखाण आहे मातेच्या कष्टांचे, तिने भोगलेल्या दैन्याचे आणि संकटांशी दिलेल्या लढण्याचे. ते एका मातेचे मंगलगान आहे. आपण कितीही लिहलं तरी आईच्या भोगलेल्या व्यथांना आपण साधा स्पर्शही करु शकणार नाही असं ते मानतात. आईकडून आपण काय शिकलात याचं उत्तर देतांना ते म्हणतात “मातीत गाडून घेतलं तर उगवता आलं पाहिजे, पाण्यात फेकले तर पोहता आलं पाहिजे, वादळात धरलं तर तगता आलं पाहिजे आणि काट्यात फेकले तर फूल होता आलं पाहिजे. हे जगण्याचं सूत्र मी आई कडून शिकलो.” भावड्याच्या आईनं जगण्याचं साधंसुधं तत्वज्ञान दिलं आहे. इतरांच्या पोटात शिरून राहता आलं पाहिजे. माणसांच्या काळजात खोपाकरुन राहता आलं पाहिजे. ज्याच्या पायाशी झुकलो त्यानेच पाठीत बुक्का हाणला तर तो आपला नाही हे ओळखता आलं पाहिजे. त्याचा नाद सोडायचा. जो काळजाला लावेल त्यालाच आपला समजायचं. किती सुलभ तत्वज्ञान आहे या माऊलीचं. म्हणून “जू” हे केवळ एक पुस्तक, आत्मकथा एव्हढं मर्यादित स्वरुपात न राहता “संस्कारांची गाथा” म्हणून ते समोर येतं. कुणी त्याला विद्यापीठाचा दर्जा देतं तर कुणी त्याला मातृभक्तीचं महंन्मंगल स्तोत्र म्हणतं. मला माझ्या अल्पबुध्दीला ती “आईच्या संघर्षाची गोष्ट” वाटते. गोष्टीची गोडी आजही अबालवृध्द, स्त्री-पुरष यांच्यात आबाधीत आहे. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज संक्रमित होते. पिढ्या, पिढ्यांना जोडते. आणि तोच दर्जा “जू” लाही मिळेल असे मला वाटते. ऐश्वर्य पाटेकर (संपर्क – ९८२२२९५६७२) या सन्मित्राला मी त्यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी आभाळभर शुभेच्छा व्यक्त करतो.

© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(४२५१०५).
९४२३४९२५९३

0
Posted on

नागराज मंजुळे यांच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ सांगत आहेत – जयेश मेस्त्री

2+

अनेकांनी नागराज मंजुळेंचा फॅंड्री पाहिलेला आहे. फॅंड्रीमुळेच मंजुळे महाराष्ट्राला परिचित झाले. फॅंड्रीच्या यशानंतर त्यांचा सैराट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण सैराट हा फॅंड्रीपेक्षा खुप वेगळा होता. सैराटबद्दल अनेकांचे मिश्रीत मत होते. पण या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड्स मोडून काढले आणि मराठी चित्रपट करोडो रुपयांचा धंदा करु शकतो, यावर शिक्कामोर्तब झाले. रसिक बर्‍याचदा कलाकाराच्या कलाकृतीच्या माध्यमातून कलाकाराचे मन वाचण्याचा प्रयत्न करतात. सैराट आणि फॅंड्री हे दोन विरुद्धार्थी चित्रपट पाहिल्यावर आपल्याला मंजुळेंचं मन काही कळत नाही. तरी दोन्ही चित्रपट हे समाजातील उच्च आणि खालच्या स्तारातील लोकांमधील संघर्षाबद्दल आहेत. पण जसा उच्च समाजाला आपल्या उच्चपणाबद्दल अभिमान किंवा अहंकार बळावू लागतो.

तसाच खालच्या समाजाला आपण उच्च नसल्याबद्दल कमकूवतपणा आणि न्यूनगंड वाटू लागतो. या दोन्ही गोष्टी इतक्या प्रचंड प्रमाणात बळावू लागतात की दोघांमधील दरी विकोपाला पोहोचते. मुळात उच्च कोण आणि खालचे कोण? हा समज सर्वच समाजात आहे. जसे एखाद्या कंपनीत मालक उच्च असतो आणि शिपाई खालच्या दर्जाचा असतो. ही भावना दोघांच्याही मनात असते. ही भावना विकोपाला गेली की त्यातून अहंकार आणि न्यूनगंड जन्माला येता. मग हा अहंकार आणि न्यूनगंड वर्षानुवर्षे पोसले जातात आणि त्यातूनच पुढे उभे राहते ते बंड. म्हणून आपल्याला कुठेतरी वाटून राहतं की कवी मनाचा हा दिग्दर्शक एका विशिष्ट हेतूने कलाक्षेत्रात उतरला आहे. अर्थात हे चूकीचंही असू शकतं. पण नागराज मंजुळेंनी लिहिलेला कविता संग्रह मी वाचला आणि मला असं वाटू लागलं की हे कदाचित सत्य असावं.

आपण जे भोगतो, जे सहन करतो त्याचे व्रण घेऊन आपण आयुष्यभर जगत असतो. आपण कितीही मोठे झालो तरी आपला भूतकाळ सदैव आपल्या सोबत राहतो. जर आपण कलाकार असू तर आपल्यावर आणि आपल्या भिवतालच्या समाजावर घडलेल्या आघातांचे वर्णन आपण करतोच. मग कुणी म्हणतं की आपण योग्य आहोत आणि कुणी म्हणतं आपण अयोग्य आहोत. पण कलाकार योग्य-अयोग्यासाठी लिहित नाही. कलाकार केवळ समाजाचा आरसा होतो. स्तुती आणि टीका या पल्ल्याड कलाकाराचे वास्तव्य असते. तिथपर्यंत पोहोचण्याचा रसिकांनी प्रयत्न केला पाहिजे. मग आपण कलाकृतीला लेबल लावणे बंद करु. मला दलित साहित्य, मुस्लिम साहित्य हे असले प्रकार कधीच पटले नाही. साहित्य हे साहित्य असते. हार फार तर आपल्याला साहित्याचे विभाजन भाषेच्या आधारावर करता येईल. मराठी साहित्य हिंदी साहित्य इ. असो. आपण मूळ विषयाकडे य़ेऊया.

उन्हाच्या कटाविरुद्ध हा काव्य संग्रह आपण मुखपृष्ठापासूनच वाचण्यास प्रारंभ करतो. मुखपृष्ठावर नागराज मंजुळेंचा धीरगंभीर फोटो आहे. तो फोटो वाचून झाल्यावर आपण आतमध्ये डोकावतो आणि पहिलीच कविता आपण वाचतो;

माझ्या हाती
नसती लेखणी
तर…
तर असती छिन्नी
सतार… बासरी
अथवा कुंचला
मी कशानेही
उपसत राहिलो असतो
हा अतोनात कोलाहल मनातला.

इथूनच कवीचं मन उलगडायला सुरुवात होते. कवी किंवा लेखक जेव्हा लिहितो. म्हणजे तो काय करतो? तर तो मोकळा होतो. त्याच्या आत जे साठलंय, त्यास वाट करुन देण्याचा आदर्श मार्ग म्हणजे लेखणी. कवीच्या मनाच्या आत प्रचंड कोलाहल माजलाय. पण हा कोलाहल समाजाने लादलेला आहे. कवीच्या भोवताली घडणार्‍या घटनेने कवी अस्वस्थ आहे आणि या घटनांचा आणि घटकांचा समाचार घेण्याचा, या विरुद्ध बंड पुकारण्याचा, विद्रोह करण्याचा त्याला केव्हाच एक मार्ग सापडलाय, तो मार्ग म्हणजेच लेखणी, कलाकृती. तुझ्या येण्याअगोदर एक पत्र या कवितेत कवी लिहितात,

माझय दहा बाय दहाच्या घरात येशील तेव्हा
माझ्या भाबड्या आईचं गबाळं स्वागत
बनियान टॉवेलातला मी
आमची कण्हतधुपत पेटणारी चूल
काळाकुळकूळीत चहा
आमचं ऑल इन वन घर
…हे सारं तुला किळसवाणं वाटल्याची खूण
तुझ्या डोळ्यांत पाहून
मी स्वतःची घृणा करण्यास विवश होईन.

मुंबई सारख्या शहरात राहिल्यामुळे आणि दहा बाय दहाच्या घरात राहत असल्यामुळे मी या कवितेतल्या भावना समजू शकतो. प्रेम ही एक दिव्य भावना आहे आणि गरीबी एक विदृप वास्तव. प्रेम आणि गरीबी एका ठिकाणी सहसा नांदत नाही. म्हणूनच कवी पुढे म्हणतो की,

ती रंगवलेली स्वप्नं इथल्या भूमीत
अंकुरणार नाही
आणि मला बोन्साय होणं मान्य नाही.
तू तुझी स्वप्नबीजं घेऊन जा
एक नवी सुपीक जमीन शोध
माझ्या या वांझोट्या भूमीला
कधीतरी दिवस जातीलच…

कोमेजलेल्या प्रेमफुलाचं दुःख साजरं करताना कवीला फुलण्याची सुद्धा आशा आहे आणि हिच आशा माणसाला जीवंत ठेवते. हेही दिवस जातील. आपलेही दिवस येतील या एका आशेवर माणूस श्वास घेत असतो. अ आणि ब या कवितेत प्रतिकात्मकतेने कवी खूप काही सांगून जातात. एक भयाण वास्तव कथून जातात,

अ.

जाहिरातीसाठी
द्यायला
हरवलेल्या माणसांचाच
घरात नसतो
एकही फोटो.

ब.

ज्यांचा
घरात
एकही नीटसा फोटो नसतो
अशीच माणसं
नेहमी हरवतात.

आपण किती मोठमोठ्या गोष्टी करत असतो. मुंबईचं शांभाय, भारत महासत्ता वगैरे वगैरे. पण आपण कधी मातीत नागड्या पायाने व उघड्या डोळ्याने चालून का नाही पाहत? का सत्य समोर आल्यावर आपण सगळेच गांधारी बनून जातो? किती किती प्रश्न शिल्लक आहेत आपल्या देशात, या जगात. पण आपण सारे त्या प्रश्नांची उत्तरे न शोधता त्यांना तुडवत पुढे जातोय.

नागराज मंजुळे त्यांच्या वास्तववादी सिनेमासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कविताही तशाच आहेत. वास्तववादी… पण माझ्यासाठी ते वास्तववादी असलंच पाहिजे असं नव्हे. कारण मी (मी म्हणजे सर्व वाचक) वेगळा आहे, माझे दुःख वेगळे आहेत. ज्यांच्यावर मला आसूड ओढायचंय ते वेगळे आहेत. पण यातील भावना त्याच आहेत. जनगणनेसाठी या कवितेत ते लिहितात,

जनगणनेसाठी

स्त्री-पुरुष असा
वर्गवारीचा कागद घेऊन
आम्ही गावभर
आणि गावात एका
अनवट वळणावर
भेटलं चार हिजड्यांचं
एक घर

हे सत्य असलं तरी आता ही परिस्थीती हळू हळू बदलतेय. या आधुनिक युगात या पंथालाही स्थान मिळत आहे. असो.

विद्रोही कवी कसे तयार होता? मुलात मी सुरेश भट आणि नारायण सुर्वे वाचल्यामुळे मला विदोही कवींच्या वेदना ठाऊक आहेत. तशाच वेदना मंजुळे व्यक्त करताना लिहितात,

एकसारख्या प्रकृतीचे
आम्ही दोघे मित्र
एकमेकांचे जिवलग
एकच ध्येय
एकच स्वप्न घेऊन
जगणारे.
पुढे त्याने आत्महत्या केली
आणि मी कविता लिहिली.

विद्रोही कविता अशाप्रकारे जन्माला येतात. आपल्याला वाटत राहतं की हे संस्कृतीवरचे आक्रमण आहे. ते असतेच मुळी. पण एखाद्यासाठी असलेली संस्कृती दुसर्‍याच्या दुःखाचे कारण बनता कामा नये. पण आजकाल तुम्ही हिंदू संस्कृतीच्या हिरोधात लिहिलं की तुम्हाला विद्रोही किंवा बंडखोर अशी पदवी मिळते. पण हिंदू संस्कृतीनेही बरेच काही सोसले आहे आणि मी त्या संस्कृतीचा पाईक आहे. म्हणूनच मी गानराज मंजुळेंची स्तुती करु शकतो. त्यांच्यासाठी माझे प्राणाहून प्रिय शब्द खर्च करु शकतो. ज्या संस्कृतीच्या विरोधात मंजुळे बंड पुकारतात त्याच संस्कृतीने हे संस्कार माझ्यावर केले आहेत. मला हे लिहिण्याचा अधिकार प्राप्त होतो कारण ज्या संस्कृतीने त्यांना शूद्र ठरवले त्याच संस्कृतीने मलाही शूद्र ठरवले. ते उन्हाच्या कटाविरुद्ध या कवितेत लिहितात,

ह्या सनातन बाहेरख्याली उन्हाला घाबरुन
तू का होते आहेस
एका सुरक्षित खिडकीतील भोभिवंत बोन्साय
अन लाचारपणे मागतेयस सावली.
पुढे यच कवितेत ते लिहितात,
का तू उन्हाच्या कटाविरुद्ध
गुलमोहरासारखं
त्वेषानं फुलत नाहीस.

ज्या सनातन संस्कृतीने मला प्रेम दिले, आधार दिला. त्याच सनातन संस्कृतीने मंजुळेंच्या मनाला मात्र वेदना दिल्या. हे असं का झालं? सारवरकर म्हणाले होते हिंदूंमधील शेवटची जात कोणती हेच कळत नाही. प्रत्येक जातीला आपण कोणातरी जातीपेक्षा उच्च आहोत असे वाटत असते. हे सावरकरांचे विधान किती तंतोतंत खरे आहे. ते म्हणायचे, उच्च वर्णीयांप्रमाणे तुमचाही हिंदू धर्मावर तितकाच अधिकार आहे. असो.

मी असा अश्रद्ध या कवितेतील या ओळी मला अधिक भावल्या,
अजूनही पूजाप्रार्थना वगैरे
करीत असशील तर…
तू त्याच्याकडे
आणखी एका जन्माचा हट्ट धर
मी मात्र मरेन
फक्त विश्वास ठेवून तुझ्यावर.

श्रद्धा अशीच तर जन्माला येत असते. श्रद्धा प्रेमातूनच जन्माला येते. मग कदाचित प्रेमाची जागा भयाने व्यापत असेल. अश्रद्ध माणूस मुळात खरा श्रद्धाळू असतो. कारण या जगात श्रद्धा नाही यावर त्याची श्रद्धा असते. ती श्रद्धा श्रद्धाळू माणसापेक्षाही खरी असते.

या पुस्तकातील सर्वच कविता वाचनीय आहेत. पुस्तक लहान आहे म्हणून एका बैठकीत वाचून पूर्ण होते. यातल्या कविता इतक्या वास्तववादी आहेत की आपल्याला काल्पनिक चंद्र सुर्य तार्‍यांच्या दुनियेत रममाण करण्यास बंदीच आहेत. मी कुणी मोठा जाणंकार नाही नाही. परंतु नागराज यांनी चित्रपट क्षेत्रासोबत साहित्य क्षेत्रातही योगदान दिले पाहिजे असे मला वाटते. कारण त्यांचा विद्रोह का कुणास ठाऊक कवितेतून अनुभवासा वाटतो.

कवितेच्या पुस्तकाबद्दल एक बरे असते. कोणतेही पान उघडून वाचता येते. मात्र आयुषयचं तसं नसतं. आयुष्याची पानं तो विश्वेवर म्हणा किंवा प्राक्तन म्हणा किंवा तुम्ही नास्तिक असाल तर एकवेळ त्यास काही नाव देऊ नका. पण आयुष्याची पाने आपण पलटवत नाही हेच खरे. कुणीतरी एक अद्रूश्य हात असतो. कोण? कुठचा? ठाऊक नाही. पण आहे मात्र… कदाचित तोच रचत असेल उन्हाचा कट आणि मग त्याच्याच इच्छेने असे असंख्य नागराज मंजुळे या कटाविरुद्ध पेटून ऊठत असतील. हे जर खरं असेल तर असे कट त्याने जरुर रचावे आणि निर्माण करावे शेकडो नागराज मंजुळे… आम्ही रसिक वाचक त्या उन्हाच्या कटाचे ऋणीच राहू…

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

मूळ लेख वाचण्यासाठी- http://www.jayeshmestry.in/unhachya-kataviruddha-nagaraj-manjule/

 

2+
Posted on

जगण्याची दृष्टी: अल्बर्ट एलिस

1+

दुःखांचे डोंगर कोसळलेले असताना,विचारांच काहूर माजलेलं असताना आपण गुरफटत जातो अविवेकीपणाच अस्तर लेवून त्यावेळी कोणच नसत आपल्याला सावरायला.काही पुस्तक आपलं ओझं हलकं करण्यासाठी बनलेली असतात कारण त्यांनीही झेललेली असतात तितकीच दुःखाची,त्यागाची आवर्तन जी जीवनाने वेळोवेळी आपल्याला बहाल केलेली असतात. फक्त या पुस्तकांना आपण स्पर्श करून पावन झालेलो नसतो म्हणून जगणं कधीच कळलेलं नसत आपल्याला आणि दृष्टीही मिळालेली नसते. एकदा की अशा दोस्ताशी यारी झाली की मग तो रिता होत जातो आपल्या मनात,मग त्याच्यात आणि आपल्यात काहीच अंतर उरत नाही.तो बोलत जातो आपली बोली आणि आपण गात राहतो त्याच गाणं. किती सुरेख ना!

अल्बर्ट एलिस सांगत राहतो जगाचं तत्वज्ञान त्याच्या पुस्तकांच्या पानात पसरलेलं,त्यात कधी आपलं बालपण डोकावत,तर तरुणपणाच्या उंबरठ्यावर केलेल्या गमतीजमती, प्रेमाचा श्वास रोखून धरायला लावणारी अधीरता, तर कधी कधी तुटत राहणार मन आणि त्याला तितक्याच प्रखरतेने जोडणारा शोधून सापडलेला मनाचा धागा. आयुष्य म्हणजे काय असतं, कस जगायचं असत हे पुस्तक तर सांगून जातच, पण एक तिसरा डोळा देऊन जात जे आपल्याला बघायला लावत क्षितीजाच्या पार व मानवी भावनांच्या जन्माच्या आणि मृत्यूच्यापार.

मला आज जाणवतंय की तो खुपच उशिरा आला माझ्या आयुष्यात, जरा लवकर आला असता तर जी जगण्याची चार पान आतापर्यंत रंगविली नव्हती,ती वेगळ्याच रंगानी रंगविता आली असती.विवेकनिष्ट उपचार गाठीला मारून मी माझ्या दुःखांच्या आणि संकटांच्या डोळ्यात पाहिल्यावर आता मला काही वेळासाठी अस्वस्थता जाणवते पण पुढच्याच क्षणी मनात दबा धरून बसलेला अल्बर्ट मला नवा रस्ता दाखवतो तेव्हा माझ्या भावनांवर विजय मिळवायला मी शिकलेलो असतो.तुम्हीही करू शकता अस काही, वाचून बघा अल्बर्ट एलिस आणि घ्या मोकळा श्वास जो आजपर्यंत कोंडलाच होता नुसता.ज्यांनी कोणी अल्बर्ट एलिसीची पुस्तकं वाचली असतील त्यांनी आपले अनुभव विशद करावेत.मी अंजली जोशींचे विशेष आभार मानतो की त्यांनी असा लाखमोलाचा माणूस मराठीत आणला.नक्की वाचा.

© डॉ.कृष्णा सुभाष सपाटे

1+
Posted on

मुखपृष्ठा विषयी…या अक्षरपेरणीच्या सदरातून

0

ज्याला तोलता येतं त्याला पेलताही येतं !

सुशिलचा आणि माझा परिचय महेश अचिंनतलवार मुळे झाला.महेश कवितेवर आणि कवीवर प्रेम करणारा मधाळ मित्र आहे.कितीतरी कवींच्या कविता त्याच्या तोंडपाठ आहेत. आणि सादरीकरण तर,क्या बात है ! सुशिलचं पुस्तक ग्रंथाली करतंय आणि मुखपृष्ठ तुला करायचंय असं त्यांनं सांगितलं.मग सुशिलने कविता पाठवल्या मेल वर.फोन ही केला. “दादा तुमची चित्र मी पाहिली आहेत.तुम्हीच मुखपृष्ठ करावं असा माझ्यासह सर्व मित्रांचा आग्रह आहे. तोवर मी सुशिलच्या कविता वाचल्या नव्हत्या.सुशिलच्या आवाजावरून,बोलण्यावरून मी त्याच्या कविता कशा असतील असा मनातल्या मनात अंदाज बांधत होतो. किती साधा सुधा,भोळा,निरागस वाटला.पण कल्पनेत त्याचा चेहराही सापडेना आणि त्याच्या कवितेचाही ठाव लागेना. निरागसता अथांग असते तिचा ठाव घ्यायला लागलं की ती अधिकच भाव खायला लागते,कारण निरागसतेला तळ असतो पण तळवा नसतो.

मेल वर कविता आल्या.’शहर आत्महत्या करायचं म्हणतंय..!’ शीर्षक वाचुन थबकलो. पॉश दूकान महागडं असेल म्हणून आपण थबकतो तसे.हळुच पान उलटलं आणि ‘”उजेड पेरणाऱ्या मशाली अद्याप कुणाच्या गुलाम नाहीत.” या अर्पणपत्रिकेतल्या ओळीनी जाम भुरळ घातली. चित्र तर इथेच होतं. पण पुढे वाचायची उत्सुकता वाढली.सरलाट वाचुन काढलं.वरवर पॉश असणारी शहरं आत किती बकाल आहेत याचं त्रिकाल दर्शन सुशिलची कविता वाचताना घडत होतं. हे शहर मला तळहातावरल्या फोडासारखं वाटलं.वरवर पातळ,तकलादू पापुद्र्यासारखी माया आणि आत खच्चून भरलेली भयाण किळसवाणी क्रूरता.जिव मुठीत घेवुन इथलं जगणं.पण हे शहरच इथल्या माणसांचा जिव आहे. लाखो हातांनी या शहराचा खोपा विणलाय.चिवचिवाट आहे,गोंगाट आहे पण मनात जिवघेण्या दहशतीचं मौनी सावट. जळुन ख़ाक होवो अथवा राख उमेदीनं उभं राहायचं बळही शहराच्या मनगटात आहे.’ही पृथ्वी शेषनागाच्या फणावर नाही तर श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे’, असे आन्नाभाऊ साठे उगीच म्हणत नाहित. कविता वाचताना चित्र स्पष्ट होत होतं. कापणाराचे हात,राबणाराचे हात,वसवणाराचे हात,फसवणाराचे हात,हे सारेच हातोहात आहे.या हाताचं एक बोट आहे हे शहर . इथल्या माणसाच्या जगण्याचं बेट आहे हे शहर. ज्याला तोलता येतं त्यालाच पेलताही येतं.शहरी जाणिवेचा अवकाश पेलुन धरणाऱ्या सुशिलकुमार शिंदे या मित्राच्या संग्रहाला शहर पेलुन धरणारा मनगटी हात मला काढावासा वाटला. काळ्या,राखाडी रंगाच्या पार्श्वभूमीवर.फिनिक्स पक्षासारखा.

पुस्तक छापून आलं आणि कितीतरी फोन आले. चित्रार्थ सर्वाना गूढ़ वाटला. बरेच जण शहराच्या आत्महत्येचे संदर्भ चित्रात शोधत होते.मी म्हटलं ही शहरं रोज मनान मरतात पुन्हा जीती होतात. मनाचं मरणं ही देखिल आत्महत्याच नाही का ?
– विष्णू थोरे,चांदवड
9325197781

0
Posted on

‘कवितेतला वासुदेव – संतोष वाटपाडे’ रणजित पराडकर

0

‘सोशल मीडिया’ हे एक अतिशय प्रभावी माध्यम आहे आणि बदलत्या

काळाच्यासमीकरणात तर छापील माध्यमांपेक्षाही जास्त प्रभावी आहे. सोशल मीडियाचापरिणाम म्हणून मी लिहिता झालो आणि ह्याचाच परिणाम म्हणून ‘संतोषवाटपाडें’सारख्यांच्या संपर्कात येऊ शकलो व समृद्धही झालो.

रविबिंब सरकले खाली
अवनीवर संध्या आली
कुंकूम भाळावर छोटे
नववस्त्र तनावर ल्याली
रांगोळी पाण्यावरही
किरणांची अवचित झाली
क्षितिजावर लुकलुकणारी
फ़ुलवात कुणाची आहेही बाग कुणाची आहे ?

ह्या प्रश्नाचं उत्तर मला केशवसुतांच्या कवितेत सापडतं. ‘देवाचे दिधले असे जग तयेआम्हांस खेळावया!’

ही बाग कवीची आहे ! ह्या कवितेत कवी संतोष वाटपाडे प्रत्येक कडव्यात दिवसाचेविविध प्रहर रंगवत नेतात आणि सगळ्यात शेवटी –

दररोज तरी धरतीला
का ओढ तमाची आहे….ही बाग कुणाची आहे ?

– असा व्याकुळ करणारा प्रश्न करतात.

फार क्वचित असा अनुभव येतो की एखादी कविता वाचल्यावर प्रचंड अस्वस्थ वाटतं, गहिवरून आल्यासारखं वाटतं, दोन चार ठोके चुकल्यासारखं वाटतं.

पहाटेच्याही जरासं आधी अचानक जाग यावी. झोप पूर्ण झालेली असावी. घराबाहेरएकाच वेळी स्वच्छ चांदणं सांडलेलं असावं आणि पूर्वेकडे रंगांच्या पखरणीला अजूनसुरुवात झालेली नसली तरी तशी तयारी कुणी तरी करत असल्याची एकअव्यक्तापलिकडची चाहूल असावी. विविध फुलांचा एकत्र सुवास दरवळत असावाआणि सर्वदूर पसरलेली नीरव शांतता देवघरात मंदपणे तेवणाऱ्या समईच्या हसतमुखस्थितप्रज्ञतेसारखी भासावी. वेळ काही क्षण थांबली आहे, असंच वाटावं. बहुतेक तीथांबतही असावी.

Continue reading ‘कवितेतला वासुदेव – संतोष वाटपाडे’ रणजित पराडकर

0
Posted on

पुस्तक परिचय: ‘व्हर्जिन’- नितीन वाघ

1+

सेक्स, व्हर्जिनिटी, कोरी स्त्री आणि मी सह आपण सारे

नितिनची ही कादंबरी खरं तर तीन महिन्यांपूर्वी आणली होती. पण वेळ मिळत नव्हता. तरीही तिला सतत वाचण्यासाठी खुणावणार्या पुस्तकात ठेवलेलं. तर दुपारी पाहुणे गेल्यावर तिला सहज हातात घेऊन बसलो. म्हटलं न चाळता थेट वाचायलाच घेऊ. आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या साडेतीन तासांत ही कादंबरी वाचून संपवली.

योगायोग असतात. सकाळी मी “ऐसे अक्षरे” मधली किरण नगरकरांची मुलाखत वाचीत होतो. ती वाचताना आपल्या व्यवस्थेचा दांभिकपणा त्यांच्या तोंडून वाचताना मला स्वतःला खूप अपराधी वाटत होतं. तेवढ्यात पाहुणे आल्याची बायकोने वर्दी दिल्यानं ती मुलाखत (दोन भागात आहे. ) अर्धीच राहिली. ती फेबुवर सापडेना म्हणून मी नितिनचा वाघ काय म्हणतोय बघूया म्हणून “व्हर्जिन ” हातात घेतली. वाघ आणि व्हर्जिन, मुखपृष्ठावरील स्त्री हे सगळे एकदम इतक॔ अंगावर आलं की बस्स !!!!

धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था. त्यातच हे वाचताना मला विजय तेंडुलकरांच्या कमलाची आणि शांततेच्या कोर्टाची आठवण झाली आणि भारतीय माणूस म्हणून मीच नितिनने उभ्या केलेल्या कटघर्यात उभा राहिलो. त्यातून सुटण्यासाठी मला साडेतीन तास लागले. पण तो काळ वाचक म्हणून फारच मोठा आहे. म्हणून हा सगळा प्रपंच. …

Continue reading पुस्तक परिचय: ‘व्हर्जिन’- नितीन वाघ

1+
Posted on

पुस्तक परिचय: हृषीकेश जोशी यांची ‘दुसरी बाजू’

0

ह्रषिकेश जोशी या लेखक व अभिनेता असलेल्या व्यक्तिमत्वाने लिहिलेले हे अप्रतिम पुस्तक आहे. जगण्यातील विसंगतीवर लेखकाने नेमकेपणाने भाष्य केले आहे. समाजातील विचारांना, घटनांना दुसरी बाजु असु शकते याचा विचारही आपण करत नाही. लेखकाने अनेक उदाहरणे देऊन ते स्पष्ट केले आहे. तर्कशुध्द, परखड, आणि नेमकी अशी पुस्तकाची भाषा आहे. काही प्रसंग लेखकाच्या पाहण्यात आलेले तर काही समाजात घडलेले. पण त्यावरचे भाष्य मात्र अचुक आहे. पुस्तकातील काही गोष्टींचा पुसटसा उल्लेख या माझ्या पोस्टमध्ये मी करतो, जेणेकरुन या पुस्तकाविषयी कुतुहल वाढुन ते वाचण्यास तुम्ही प्रवृत्त व्हाल.

१) निर्भया प्रकरण देशभर गाजले आणि समाजात त्याचे विविध पडसाद उमटले. त्या काळात लेखकाने एका हिंदी वाहिनीवरील लहान मुलांच्या शोच्या परीक्षकाचे काम केले होते. एका छोट्या मुलीने अभिनयासाठी जो प्रवेश सादर केला, त्याचा लेखकालाच धक्का बसला, काय होता तो प्रसंग?  Continue reading पुस्तक परिचय: हृषीकेश जोशी यांची ‘दुसरी बाजू’

0
Posted on

‘लिलियनची बखर’- पुस्तक परिचय

3+

‘लिलीयनची बखर’
लेखक: अनंत सामंत
प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

म्हणावं तर ऐतिहासिक किंवा सत्यकथा असणार हे पुस्तक, इतिहासाने किती नररत्न आपल्या उदरात सामावून घेतले आहेत याचा उत्कृष्ट नमुना आणि त्यापैकीच एक असणारा ‘राजा कृष्णाजी भट’ यांच्याबद्दल सांगणारे हे पुस्तक.
साधारणपणे कान्होजी आंग्रे यांच्यानंतर समुद्रावर दहशत निर्माण करणारा हा योद्धा. हा राजा तसा मराठेशाहीतीलाच, पण ना याची कोणती जहांगीर, ना कोणती वसाहत, ना कोणता राज्याभिषेक, ना कोणता बडेजाव. बाकी याचं स्वतःच अस असणार एकमेव जहाज ज्याच नाव ‘दुर्गा’ आणि त्याच्यावर त्याच स्वतःच अस फडकणार निशान ते म्हणजे पांढऱ्या झेंड्यावर स्वस्तिक. या झेंड्याची व गलबताची जरब इंग्रज, पोर्तुगीज तसेच सिद्द्यांना सुद्धा होती.
पुस्तकाची सुरवात ऐतिहासिक पुराव्याने होते. साधारणपणे जून १७२७ च्या आसपासच्या काळातील झालेल्या घडामोडी यात चितारण्यात आल्या आहेत. राजा कृष्णाजी भट, इंग्रजांचा चीफ एजंट सर गिफर्ड, गिफर्ड ची नात शोभावी अशी पण त्याची असणारी तिसरी बायको लिलीयन गिफर्ड व बऱ्याच जहाजांवर मर्दुमकी गाजवलेला कॅप्टन कॅम्पबेल यांच्याशी निगडित असणाऱ्या गोष्टी यात मांडण्यात आल्या आहेत.
लंडन मध्ये एका रिकाम्या वाड्यात काही हस्तलिखित सापडली. काही इतिहासकारांच्या मते त्यातील हस्ताक्षर हे लिलीयन गिफर्ड यांचे असावेत व त्या नोंदीवर आधारित हे पुस्तक असल्याने यास “लिलीयनची बखर” हे नाव देण्यात आलं असावं.
बंडखोर, अन्यायाची चीड असणारा कृष्णाजी भट हा तितकाच सुसंस्कृत व एखाद्या इंग्रजाला लाजवेल अशी इंग्रजी बोलतो. हा योद्धा अरबी समुद्रात होणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज व सिद्दी याच्या जहाजाच्या वाहतुकीवर दहशत ठेवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करून ती वेगवेगळ्या उपयोगी कारणा करिता खर्च करतो. अशाच एका ‘डेस्टिनी’ या इंग्रज जहाजाला पकडल्यावर त्याचा सापळा रचून डेस्टिनीला वाचवायला येणाऱ्या ‘क्रिस्टल’ ह्या सर गिफर्डच्या जहाजाला कावेबाज व शिताफीने शरण येण्यास भाग पाडून त्याबदल्यात पन्नास हजार पौंडची मागणी व त्याबदल्यात खुद्द सर गिफर्डची असणारी तिसरी बायको लिलीयन गिफर्ड हिस ओलीस ठेऊन घेणे हे एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारखं लेखकाने या पुस्तकात मांडलंय. या सर्वातून सुटता यावं म्हणून सर गिफर्ड ने केलेला विश्वास घातकीपणा व कप्तान कॅम्पबेल चा धुर्तपणा सुद्धा यात उत्कृष्ट पणाने मांडलाय. लिलीयन ला ओलीस ठेवल्यावर तिचा असणारा कृष्णाजी भटा बद्दल चा तिरस्कार व पुढे जाऊन त्या तिरस्काराचे होणारे प्रेमात परिवर्तन त्यांनतर सुद्धा कृष्णाजी भटा ने इंग्रजांच्या हृदयात भरवलेली धडकी हे वाचण्याजोगे आहे .
हे पुस्तक वाचताना एखादा हॉलिवूडपट डोळ्यासमोर चालू आहे असं लिहल असून बऱ्याच वेळेला ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’ या चित्रपटाची आठवण होते.

– महादेव कुंभार

3+