Posted on

#मी टू

0

#मीटू या मोहिमे अंतर्गत अनेक लोकांचे पितळ उघडे पडत आहे. बॉलिवूड हे सदैव वादात अडकले आहे. मुळात आपण ज्यांना चरित्र अभिनेता अथवा हिरो म्हणतो, तेच या अन्यायाचे काळे भागीदार आहेत. स्त्री व पुरुष खांद्याला खांदा लावून काम करतायेत. सर्वदूर तिच्या कामाचा धडाका आहे. सर्वदूर तिचे कौतुक आहे. पण पुरुषप्रधान संस्कृती आणि वासनांध नजरा ह्यापासुन तिची सुटका केली गेलेली नाही. ह्यातच समाजाचे अपयश आहे. स्त्री वर असलेला ताबा आणि तिने आपलेच ऐकावे हा अट्टाहास म्हणजे एक प्रकारचा पुरुषी अहंकार आहेच.

पण हे सगळे घडण्याला कारणीभूत काय आहे? इतके कठोर कायदे असूनसुद्धा असे का व्हावे?
आपल्या समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय ? आपले संस्कार एक आणि आचरण वेगळे असे का ?.
समाज आणि समाजमाध्यमे ज्यात आपण आणि तमाम दृकश्राव्य गोष्टी सिनेमा, टीव्ही, जाहिराती आणि तत्सम बाबी येतात यांतून स्त्रीयांना ज्या पद्धतीने दाखविले जाते व आवडीने पाहिले जाते. आणि हाच हिणकस विचार समस्त स्त्रीवर्गाला लागलेला अभिशाप आहे.
सिनेमा आणि नाटकक्षेत्रात उतरायचे असेल किंवा एखाद्या संस्थेत, व्यवहारिक जीवनात पुढे जायचे असेल तर तिची आधी मानसिक आणि शारीरिक पिळवणुक केली जाते. यापेक्षा सामजिक दळभद्रीपणा कोणता. मग जी लोकं अशी पिळवणूक करतात त्यांच्यात आणि जनावरात काय फरक आहे? तुरळक अपवाद वगळता बहुतांशी सिनेजगतात अशी नामांकित, सुशिक्षित आणि बडेजाव करणारे समाजसेवक या प्रकारातील जनावरे आहे. आणि या टोळक्यामुळेच या क्षेत्रात जाणाऱ्या स्त्रियांना सहमती आणि असहमतीशिवाय अनेक गोष्टी कराव्या लागत आहेत. तनूश्री ने जो मुद्दा उचलला आहे त्याला ज्या पद्धतीने बळ मिळाले आणि अनेक वर्षांची घुसमट बाहेर पडली, त्यामुळे या प्रश्नाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेण्यासारखी आहे.
आणि समाजाच्या विचित्र वागण्यानुसार, नुसते दिखाव्याला का होईना समाज स्त्रियांची बाजू घेत असतो.
त्यामुळे स्त्रियांचा विकास होऊनसुद्धा स्त्री जातीला आपल्या बंधनात ठेऊन घेण्याचा प्रकार पुरुष वर्गाकडून केला जातो. व पुरुषवर्गाचा तिटकारा म्हणून स्त्री ही नेहमीच आपली भूमिका कठोर निर्णयात रुपांतरीत करते. मग या कठोर वर्तनात वा निर्णयात सुसंस्कृत पुरुषवर्ग सुद्धा होरपळतो. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री वर्गाची ससेहोलपट होतेच. स्त्री जीवनाचा संघर्ष ते तिचा विकास इथपर्यंत सर्व गोष्टी योग्य आहेत पण करिअर या नावाखाली समाजाने तिची जी दुरावस्था केली आहे, ती अत्यंत वाईट आहे.
“स्त्री व पुरुष ही रथाची दोन चाकं आहेत. दोन्हींचा विकास झाला तरच आयुष्य सुरळीत होईल.”
“तिचा मान राखला गेला तरच सुसंकृत पिढी निर्माण होईल”

प्रविण शांताराम
www.pravinshantaram.com

0
Posted on

What is Formatting? Why it is important?

0

What is formatting?

Formatting means How exactly your content looks and behaves on screen. It is similar technical task that one expects from their DTP operator or the publisher to do about their content. For example… “Make this bold…”, “make paragraph here..”, “Underline this….”, “Enlarge title… make it bold and big…”. These are just few examples; actually the technical part is much more than Bold, italics and underline.

Why formatting is required?

For print books the formatting is simple because the book is going to remain of same size throughout but in eBooks it requires working every minute details so that even the gadget may change the performance your eBook shall remain same.

Poor formatting disturbs, distracts and disappoints your buyer reader.

Without proper formatting your text, images, links and overall eBook may behave in very unpleasant manner.

How Bronato solves the formatting challenge?

At Bronato every word, every sentence and every paragraph will be Formatted as per your expectations. If you have already a print book then the formatting is done as per the print book so that your buyer readers will have similar experience of reading your print book. So that whether the reader is reading your eBook on smartphone or a tablet he/she experiences flaw less reading.

Right formatting motivates the buyer-reader to continue reading.

 

0
Posted on

अरण्यवर्षं या काव्यसंग्रहाचे प्रकाशन …

0

निमंत्रण

नारायण सुर्वे कवी कट्ट्यावर आज 09/12/2017 कविमित्र सत्यजित पाटील यांच्या अरण्यवर्षं या काव्यसंग्रहाचे प्रकाशन …
हस्ते:- वनाधिपती विनायक दादा पाटील .
प्रमुख अतिथी – प्राचार्य :- दिलीप शिंदे, कवी विष्णू थोरे , मनोहर विभांडिक, प्रा. राहुल पाटील
आरण्यवर्षं या काव्यसंग्रहातील कवितांचे अभिवचन
सादरकर्ते – सुशीलताई संकलेच, आरती बोराडे, संजय गोरडे, आकाश कंकाळ, जयश्री वाघ
रवी शार्दूल .
सूत्रसंचालन – कवी रवींद्र मालुंजकार .
सहभागी संस्था पदाधिकारी
काव्यमंच, नाशिक कवी , संवाद, रसयात्रा, कुसुमाग्रज साहित्यिक मंच, मराठी साहित्य परिषद, प्रगतिशील लेखक संघ
निमंत्रक – सत्यजित पाटील आणि पाटील परिवार .
नारायण सुर्वे कवी कट्टा .

आज शनिवार दिनांक 9 डिसें रोजी सायंकाळी 4:00 वाजता
सुर्वे वाचनालय सिडको नाशिक .
सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती

0
Posted on

तेंडुलकरांच्या ९०व्या जयंतीनिमित्ताने व्याख्यानमाला

1+

या वर्षी हिवाळ्यात महाराष्ट्र प्रवासात काहीतरी वेगळं करायचं ठरवलंय… म्हणून पुरेशी आधीच ही पूर्वसूचना द्यायचा विचार केलाय…!
एक समर्थ नाटककार म्हणून मराठी साहित्यात विजय तेंडुलकरांचं स्थान नक्कीच निर्विवाद आहे… त्यांची अनेक नाटके वेळोवेळी कितीही खळबळजनक ठरली असली तरीही तेंडुलकरांच्या लेखणीचं सामर्थ्य तर नाकारलं जाऊ शकत नाही हे नक्की…!

कधीतरी सन ७०-७५ च्या दरम्यान काही नाटकांचे प्रयोग पाहिले तेंव्हाच तेंडुलकरांची वैचारिक अभिव्यक्ति मनाला भावली… १९७७-७८ नंतर संन्यस्त जीवनात उत्तर भारतात राहू लागल्याने काही नाटकांचे रंगमंचावरील प्रयोग पाहू शकलो नव्हतो तरी त्यातल्या काहींचे यूट्यूब-प्रसारण पाहिलं तर काहींच्या संहिता पुस्तकरूपात वाचल्या.
अर्थातच मला या नाटकांमधून अभिव्यक्त झालेली तेंडुलकरांची वैचारिक चौकट इतरांपेक्षा थोडी वेगळ्या प्रकारे उमजत गेली एवढं नक्की…!
प्रा.डाॅ.बर्वे सर सुमारे ३१-३२ वर्षांपूर्वी केदार-बदरी तीर्थयात्रेला गेले असताना मला बदरीनाथमध्ये भेटले, तेंव्हाचा आमचा परिचय पुढे वर्षानुवर्षे माझ्या पुणे दौर्‍यात अत्यन्त दृढ होत गेला. मराठी काव्य आणि साहित्याबद्दलची दोघांच्याही मनातली आवड हा या वाढत्या संबंधातला मोठा दुवा म्हणावा लागेल.


एक अध्येता म्हणून स्वतःच्या पीएच्.डी साठी बर्वेसरांनी लिहिलेला शोधप्रबंध हा तर तेंडुलकरांच्या नाटकांची वस्तुनिष्ठ समीक्षा करणारा पहिलावहिला प्रयत्न होता. साहजिकच बर्वेसर हे तेंडुलकरांच्या नाटकांच्या अध्ययनाच्या बाबतीतले पुरोधा ठरतात. त्यांच्या प्रबंधावर आधारित “तेंडुलकरांची नाटके” या समीक्षात्मक पुस्तकाची द्वितीय संवर्धित आवृत्ती गेल्या ६ जानेवारीला प्रकाशित झाली, तेंव्हापासून सातत्याने आपसात होत आलेल्या चर्चेतूनच आत्ताच्या या व्याख्यानांची कल्पना जन्माला आली.
येत्या ६ जानेवारीला तेंडुलकरांची ९० वी जयंती… त्यानिमित्ताने आयोजित व्याख्यानमाला आयोजनाच्या सोयीनुसार आठवडाभर आधी म्हणजे दि.२८, २९ व ३० डिसें.२०१७ या दिवसात होणार असून मी या तीन दिवसात तेंडुलकरांच्या नाटकांमधून अभिव्यक्त झालेली विचारधारा मला उमजली तशी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
तेंव्हा आत्तापासूनच या तारखांची नोंद करून ठेवावी आणि कार्यक्रमात आपल्या उपस्थितीचा लाभ द्यावा हा आग्रहपूर्वक अनुरोध आहे….!

1+
Posted on

वाचन प्रेरणा दिवस

1+

#वाचनप्रेरणादिन

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

!!!वाचनसंस्कृती जपण्याचा एक लहानसा प्रयत्न !!!

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रगत भारताचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा जन्मदिन १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येईल.

देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करून स्वत:ला समृद्ध कशी करेल आणि त्यायोगे देश कसा शक्तिशाली होईल, असाच विचार माजी राष्ट्रपती डॉ. कलाम नेहमी करीत असत. 

प्रतिष्ठानतर्फे ‘वाचन प्रेरणा दिन‘ या उपक्रमांतर्गत ‘ऑनलाइन वाचनकट्टा’ राबवण्यात येईल. 

धन्यवाद!!

#वाचनप्रेरणादिन

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

1+
Posted on

पुणे बुक फेअरला सुरवात

0

पश्चिम भारतातील सर्वात मोठे ग्रंथ व शिक्षण प्रदर्शन “पुणे बुक फेअर अर्थात पुणे पुस्तक जत्रा ” या मालिकेतील १६व्या प्रदर्शनाचे उदघाटन महाराष्ट्र सरकारचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक या प्रमुख पाहुणे तर पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.नितिन आर करमळकर पुणे बुक फेअरचे संयोजक पी.एन.आर.राजन व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी,प्रकाश पायगुडे,सुनितिराजे पवार,अनिल गोरे व दिपक करंदीकर हे उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकांमधये राजन म्हणाले “विविध विषय व विविध भाषांमधिल पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध करुन देणे,समाजातील वाचन संस्कृती वृध्दींगत करणे , तरूण पिढी पुस्तकांकडे आकर्षित करणे व त्यातुन सुशिक्षित समाज निर्माण व्हावा या हेतूने गेली १५ वर्षे पुणे बुक फेअर हे ग्रंथ प्रदर्शने भरवित आहेत. ”
मिलिंद जोशी म्हणाले “आता स्मार्ट सिटी प्रमाणे स्मार्ट वाचक होणे आवश्यक आहे. प्रत्येक गाव,जिल्हा आणि तालुक्यांमध्ये फिरती वाचनालये उपलब्ध केल्यास गावोगावी चांगले वाचक तयार होतील. विविध संस्थांच्या सहभागामुळे पूणे बुक फेअरचे बळ आता वाढले आहे. आता समाजाने साहित्याभिमुख होण्याची गरज आहे. ”
मुक्ता टिळक म्हणाल्या “अक्षर फराळ ही महाराष्ट्राची मोठी परंपरा व मानबिंदू आहे. पुस्तक जत्रेमध्ये वेगवेगळे विषय असल्याने त्याचा लाभ अनेक जाण घेतात.पुणे बुक फेअर ही एक आता साहित्यिक चळवळ हेाऊ पहात असल्यामुळे पुणे बुक फेअरचे त्यांनी अभिनंदन केले. ”
दिवाकर रावते म्हणाले“ अशा पुस्तक जत्रेमधून विविध लेखकांचा नवा परिचय होतो. वाचनाने मन आनंदीत होऊन ताणतणाव कमी होण्यास मदत होते व शांतपणे झोप लागते. जगातील मोठे झालेल्या लोकांचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झालेले आहे. बौध्दीक विद्वत्ता व सुशिक्षितपणा हा केवळ मातृभाषेेतून शिक्षण झाल्यास येतो. ”

प्रदर्शनात देशातील व परदेशातील नामवंत पुस्तक विक्रेते / वितरक, प्रकाशन संस्था, शैक्षणिक संस्था, भारत सरकार व महाराष्ट्र सरकारची प्रकाशने, माहिती, आरोग्य्य, व्यवस्थापन, व्यापार , काय्यदा, धर्म, राजकारण, साहित्य, अश्या विविध विषययांवरील मराठी, हिंदी,गुजराथी उर्दू, संस्कृत, तर जपान व इराण अशा परकीय भाषामधिल सत्तर हजाराहून आधिक पुस्तके, वृत्तपत्रे, साप्ताहिके , मासिके व ग्रंथ उपलबध आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषद, ग्रंथालय संचालनायल,महाराष्ट्र राज्य.पुणे जिल्हा परिषद,पुणे महानगर पालिका, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन, महाराष्ट्र,स्वरूप वर्धिनी, साहित्य सेतु;सोशल मिडिया पार्टनर,बी.जी.टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स(टॅ्रव्हल पार्टनर) आकाशवाणी ;(रेडिओपार्टनर) यांचे विशेष सहकार्य प्रदर्शनाला लाभले आहे.
प्रदर्शनाबरोबर वाचन संस्कृती वाढावी विशेषत: तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या साठी महाराष्ट्र साहित्य्य परिषदेच्य्या सहकार्य्याने साहित्य्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोेजन करण्य्यात आले आहे. काव्य्यशिल्प पुणे आय्योजित निमंत्रितांचे कविसंमेलन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद आययोजित नवोदितांचे कविसंमेलन ( गुरूवार १२ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता.) शांता शेळकेंच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम सादरकर्ते : स्नेेहल दामले/चैत्राली अंभ्यकर (शुक्रवार १३ऑक्टोबर साय्यंकाळी ६.३० वाजता.) एकपात्री कलाकार परिषद प्रस्तुतद.मा.दमदार (मिरासदारांच्य्या कथांवर आधारित कथाकथनाचा कार्य्यक्रम) कथाकथनकार : मकरंद टिल्लूू, अशोक मुरूडकर, विश्‍वास पटवर्धन व अरुण पटवर्धन (शनिवार १४ ऑक्टोबर साय्यंकाळी ६.३० वाजता.). वाचन प्रेरणादिनानिमित्त “ मला आवडलेले पुस्तक या विषय्यावर पाच शाळांतील पाच विद्याथ्य्यार्ंची मनोगते व्यक्त करणार आहेत. (रविवार १५ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता) हे सर्व कार्यक्रम मराठा चेंबर ऑफ कॉमर्स सभागृह, टिळक रस्ता, पुणे येथे होणार असून सर्वासाठी खुले आहेत.

 

. या वेळी ज्ञानभाषा आयोजित निबंध स्पर्धेतील विजेते जयंत र. मराठे (प्रथम)श्रिमती निलिमा इनामदार (दुसरा) भागयश्री गणेश फाटक ( तिसरा) व रितेश शिवराज वर्मा यांचा सत्कार करण्यात आला.
शैलेश जोशी यांनी सुत्रसंचालन केले तर प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.

दिनांक ११ ते १५ ऑक्टोबर २०१७ दरम्य्यान गणेश कला क्रिडा मंच, स्वारगेट पुणे येथे भरणारे पुणे बुक फेअर २०१७ हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी खुले आहे.

पी. एन. आर. राजन
संयोजक
९४२२० – ३०३२६

फोटो


१)पुणे बुक फेअरच्या उदघाटन प्रसंगी(डाविकडून)सुनितिराजे पवार,प्रकाश पायगुडे ,पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक ,पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.नितिन आर करमळकर ,राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते ,अनिल गोरे,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी,आणि
पुणे बुक फेअरचे संयोजक पी.एन.आर.राजन


२) पुणे बुक फेअरच्या वेळी पुस्तकांच्या गुच्छ स्विकारतांना (डाविकडून) महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशा,राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते ,पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि पुणे बुक फेअरचे संयोजक पी.एन.आर.राजन


३) ४) पुणे बुक फेअर बघतांना राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावत

0
Posted on

५०,००० ईपुस्तके, ३२ देश, एकच प्रकाशक

1+


नमस्कार मान्यवर, 

जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून Bronato.com ने किमान 32 देशांमध्ये 50,000 ईपुस्तक डाऊनलोड्सचा पल्ला पार केला.

पुढील प्रवासात आम्हाला तुमची मदत हवी आहे.
पुढीलपैकी कोणतीही एक गोष्ट करा
१. साहित्याशी संबंधीत तुमच्या whatsapp groupमध्ये मला add करा किंवा
२. अशा ग्रुपमध्ये सोबत जोडलेचे चित्रक शेअर करा किंवा
३. पुस्तक प्रकाशन, कवी संमेलन, कथाकथन, लेखन कार्यशाळा ई. बाबतची माहिती मला निःसंकोच फॉरवर्ड करा. किंवा
४. www.bronato.com ला भेट द्या व शेअर करा किंवा
५. होतकरू लेखक/लेखिकांचे मोबाईल नंबर आम्हाला पाठवा किंवा
६. आर्थिक पाठबळ उभे करण्यास मदत करा

ईपुस्तक उद्योग उभारणे हे प्रचंड मोठे काम आहे पण तुमच्या सहकार्याने ते शक्य देखील आहे.

लोभ असावा.
किंडल व अँड्रॉईड ईपुस्तक उद्योजक व प्रकाशक

1+
Posted on

हीच माझी कहाणी

5+

स्वप्न असतात मोठी.. काही खरी.. काही खोटी..

   “हीच माझी कहाणी”

कथा लेखन: निनाद वाघ

***********************************************************************

“दादर स्टेशन यायला अजून किती वेळ आहे?” मी माझ्या शेजारच्या प्रवाशाला विचारलं.

“साधारणतः १० मिनिटं” ते म्हणाले

“अच्छा Thank You काका”

हळूहळू लोकं आपआपल्या सामानासह दरवाज्याकडे रांग लावत होती. मी सुद्धा माझं सामान एकत्र केलं. गाडीचा वेग आता जरा मंदावला होता पण माझ्या हृदयातली धडधड मात्र वाढली होती. अर्थात नव्या शहरात चाललो आहे ह्याची उत्सुकता होतीच पण त्या सोबत थोडी भीतीही होती.

एक अनोळखी शहर, त्या शहरातील अनोळखी माणसं आणि त्याच शहराचा आता आपणही एक भाग होणार ह्याचं कुतुहल.

मुंबई सारख्या ह्या मायानगरीत येणं हे माझ्यासाठी एक स्वप्नंच होतं जणू. जसं अनेकांचं असतं ना, अगदी तसंच.

आज मला ते पूर्ण होताना दिसत होतं. एक नवीन प्रवास सुरू होणार होता. आनंद तर होताच पण मनाला थोडी हूरहुर लागून राहिली होती. घरून निघताना आईचा तो हळवा झलेला चेहरा सारखा डोळ्यांसमोर येत होता. आईला असं एकटं सोडून इतकं लांब मी ह्या अगोदर कधीच आलो नव्हतो. येताना मलाही खूप त्रास झाला होता पण MBA चं शिक्षण मुंबईत घ्यायचं ही माझीच इच्छा होती आणि आईलाही ती मान्य होती.

बघता बघता दादर स्टेशन आलं. सगळेच घाईघाईने उतरत होते. तसा मीही उतरलो. मुंबापुरीच्या जमिनीवर पाय ठेवताच माझं स्वागत झालं ते स्टेशनवरच्या अलोट गर्दीनं. खरं सांगतो, हे पाहून मी पूर्णपणे भांबावून गेलो होतो. ह्या आधी इतकी माणसं कधी पाहिली नव्हती. जिथे बघावं तिथे दिसत होती ती नुसती माणसे. कसाबसा त्यातनं वाट काढत मी स्टेशन बाहेर पोहोचलो अन् सुटकेचा निश्वास सोडला. आईला फोन करून कळवलं.

कधी एकदा रूमवर जातो असं झालं होतं. थकवा जाणवत होता. भूकही प्रचंड लागली होती. खायचं कुठे हा प्रश्न होता. इतक्यात समोरच एक वडा पावची गाडी दिसली. तिथेही चिकार गर्दी. ज्या मुंबईच्या वडा पावाबद्दल ऐकून होतो तो खाल्ला आणि मन अगदी तृप्त झाले.

मुंबईला येण्याआधीच मी फोनवरून PG म्हणून प्लाझा जवळ रूम घेतली होती.

” काका प्लाझाला कसं जायचं? ” मी एका माणसाला विचारलं.

” समोरून तुम्हाला Taxi मिळेल ”

” ओके थँक्यू ”

समोरच्या बाजूला लगेच Taxi मिळाली आणि त्यानं मला प्लाझाकडे सोडलं खर पण नेमका पत्ता शोधताना मात्र माझा गोंधळ उडाला होता. मला माझी बिल्डिंग काही सापडेना. मी माझ्या केअर टेकरना फोन लावला. तो काही लागला नाही.

अनेकांना पत्ता विचारला तर कुणी म्हणालं राईटला आहे, कुणी म्हणालं लेफ्ट. बिल्डिंग कुठल्या एका गल्लीत होती म्हणून लोकाना बहुतेक ती माहीत नसावी. माझी शोध मोहिम सुरुच होती.

जवळपास तास उलटून गेला. आता मात्र मला भिती वाटू लागली. आईची आठवण येत होती. काय करावं तेच समजत नव्हतं. हळूहळू काळोख होत होता. मी हताश होऊन एकटाच रस्त्याच्या कडेला बसलो होतो. मी आणि माझं सामान. ह्या अनोळखी शहरात जाणार तरी कुठे?

आजूबाजूला गाड्यांची तसंच माणसांची खूप वर्दळ होती पण तरीही एकटं वाटत होतं…

रात्र झाली तशी मनातली भीती अजून वाढत होती. नेमकं काय करावं हेच सुचत नव्हतं. शेवटी पुन्हा दादर स्टेशनकडे जावं आणि तिथल्या वेटिंग रूममध्ये राहावं असं मी ठरवलं. आईला ह्यातलं काहीच सांगितलं नव्हतं. नाहीतर उगाच ती काळजी करत बसली असती.

सामान उचललं आणि प्लाझावरून दादर स्टेशनला निघालो. नेमका रस्ता माहिती नसल्याने असंच एका गल्लीत शिरलो तर तिथे मला स्वामींचा मठ दिसला. मठाची दारं बंद होती. फक्त एक छोटी खिडकी उघडी होती ज्यातनं स्वामींचा फोटो दिसत होता. मी हातातलं सामान खाली ठेवलं. डोळे मिटले अन् स्वामींकडे प्रार्थना केली.

“स्वामी आज मुंबईत पहिल्यांदा आलोय. काही स्वप्नं पाहिली आहेत ती पूर्ण करायला. तुमचा आशीर्वाद असुद्या. आता सुद्धा खूप एकटं एकटं वाटतंय. भीती वाटतेय. मला माहिती आहे की तुम्ही माझ्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं योजिले असणार. ह्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा. लक्ष असुद्या”

तिथून पुन्हा स्टेशनकडे चालायला सुरूवात केली. इतक्यात खिशातला फोन वाजला. केअर टेकरांचा होता.

“हेलो…”

“हेलो.. हा कुणाचा नंबर आहे? आताच मी १०-१२ मिस कॉल पाहिले”

“मी समीर बोलतोय. समीर वामन खानोलकर. तुमचा पी. जी.. आपलं फोनवर बोलणं झालं होतं. मी मुंबईत आलोय. तुमचं घर सापडेना म्हणून फोन केलेला पण तुम्ही उचलला नाही..”

“सॉरी.. खरंच खूप सॉरी.. मी कामात गुंग होते आणि फोन सायलंटवर होता हे लक्षात आलंच नाही.. आता मिस कॉल पाहिले..”

“मी खूप घाबरलेलो. आता पुन्हा दादर स्टेशनला निघालो होतो.”

“आता कुठे आहेस?”

“मी आता स्वामींच्या मठाजवळ आहे”

“अच्छा.. थांब तिथेच.. मी येते तुला घ्यायला.”

त्यांनी फोन ठेवला आणि माझ्या जिवात जीव आला. खरंच ही सारी स्वामींची कृपा होती. मी पुन्हा हात जोडले आणि मनापासून त्यांचे आभार मानले.

मी उभा होतो. इतक्यात एक वयस्कर बाई येताना दिसली.

“समीर??”

“हो”

“मी मनोरमा दिक्षित. चल सोबत माझ्या.. दोन बिल्डिंग सोडून आपलं घर आहे.”

आम्ही घरी आलो आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. सामान खोलीत ठेवलं इणि फ्रेश झालो. दिवसभरात जाम थकलो होतो पण अखेर मुंबईत आलोच ह्या उत्साहात तो जाणवत नव्हता. मला अतोनात आनंद झाला होता.

“काय रे सामान ठेवलं का व्यवस्थित? ये दोन घास गरम जेवून घे.. थकला असशील.. जेवला की बरं वाटेल. शांत झोप लागेल.. माझ्यामुळ्ये उगाच तुझी गैरसोय झाली.”

“आजी.. All is well that ends well..तुम्ही उगाच वाईट वाटून घेऊ नका”

मी जेवायला बसलो. भूक लागलीच होती. आजींच्या हाताला चव होती. जेवल्यावर छान वाटलं. बिछान्यावर पडलो तशी लगेच शांत झोप लागली. मुंबईतली पहिली रात्र. उद्यापासून एक नवं आयुष्य सुरू होणार होतं. एक नवीन प्रवास.. तो पर्यंत डोळ्यांत स्वप्न घेऊन लागलेली ती पहिली शांत झोप..

रात्र ही सरणार

घेऊन स्वप्नं नवी..

दिवस नवा उजाडणार

सुखाचा आरंभ होणार..

मुंबईत येऊन आता जेमतेम दोन दिवस झाले होते. ह्या अनोळख्या बलाढ्य शहरात माझं कुणीही ओळखीचं नव्हतं असं जरी मी म्हटलं तरीही आता मात्र मला एक हक्काचं असं माणूस सापडलं होतं. त्या म्हणजे माझ्या केअर टेकर आजी. अगदी दोन दिवसांत आमची छान गट्टी जमली होती. वयानं जरी म्हाताऱ्या असल्या तरी त्यांच्यातील ऊर्जा इतकी अफाट होती की एखाद्या लहान मुलालाही लाजवेल.

दिवसभर स्वतःला कामात बुडवून घ्यायचं. सतत काही ना काही काम सुरूच.

“काय रे समीर, आज रात्रीच्या जेवणात काय बेत करायचा?”

“अहो आजी, असं काही नाही तुम्ही नेहमी करता तसंच करा. उगाच माझ्यासाठी म्हणून वेगळं काही नको. खरंच”

“वेगळं वगरे काही नाही. उलट तुझ्या आवडीचं करायला मला आवडेल”

“कशाला हो उगाच. तुम्ही थकत नाही का? दिवसभर इतकं काम करत असता ते.”

“इतकी वर्ष झाली. एकटीच राहतेय. सगळं स्वतः करते. आधी एकटेपणा जाणवायचा. हे रिकामं घर खायला उठायचं. मग स्वतःला कामात बुडवून घेतलं. मसाले, पापड, लोणची करून विकायचे.. असो.. माझ्या मेलीची बडबड आपली सुरूच राहणार.. तू सांग जेवणाचं काय ते? बिर्याणी करू का? आवडेल का?

“हो आजी. आवडेल”

आजीच्या त्या बोलण्यामागे कुठेतरी एक खंत जाणवली. प्रत्येक माणसाची अशी एक स्टोरी असते. तशीच आजींचीही होती. नक्कीच काहीतरी घडलं होतं त्यांच्या आयुष्यात. खोलवर कुठेतरी उरात जखम होती.

रात्री आजीच्या हातची चमचमीत बिर्याणी खाल्ली. अगदी मायेने त्यांनी केली होती.

जेवणानंतर आजी सगळं आवरून ठेवायच्या. दोन दिवसांत मला एक गोष्ट जाणवली होती ती म्हणजे त्या स्वच्छते बाबत फार काटेकोर होत्या. घर कायम नीट नेटकं असायचं.

“आजी ती ताटं द्या मला. मी आवरून ठेवतो”

“काही नको. तू आराम कर. रात्रही फार झाली आहे. झोप हवं तर. माझं होतच आलंय”

“झोप येत नाही मला. आजी जर तुम्हाला चालणार असेल तर आपण छान गप्पा मारूया का?”

“हो चालेल.”

“तुम्हाला झोप तर आली नाही ना?”

“नाही. उलट तुझ्याशी गप्पा मारल्या तर छानच वाटेल”

आम्ही खिडकीपाशी बसून छान गप्पा टाकल्या. आजी मला मुंबई बद्दल सांगत होत्या. इतक्या वर्षात मुंबई कशी बदलत गेली त्या बद्दलही सांगत होत्या.

एकीकडे आजीच्या गप्पा तर दुसरीकडे खिडकीतून ती शांत तरीही गजबजलेली मुंबई दिसत होती.

“आजी तुमच्याशी गप्पा मारून खूपच मज्जा आली”

“मलाही छान वाटलं. इतक्या वर्षांनी कुणाशी इतक्या गप्पा मारल्या मी. पूर्वी मी आणि रोहन सुद्धा अशाच रात्री गप्पा मारत बसायचो.”

“रोहन?”

“काही नाही. रात्र फार झाली आहे. चल झोपायला”

असं म्हणत त्या आतल्या खोलीत गेल्या. अन् मी पाहत राहिलो त्यांच्याकडे.. मनात असंख्य प्रश्न घेऊन.

मन अस्वस्थ झालं होतं. सारखा मनात एकच विचार होता की हा रोहन कोण असेल!

आजींचा मुलगा असेल का? किंवा मग नातू? पण मग त्यांनी त्याच्या बद्दल बोलणं का टाळलं असावं? हा रोहन जो कुणी आहे तो आता कुठे असेल? काय करत असेल? की मग…

मनात भलते सलते विचार येऊ लागले. हे विचारचक्र असंच सुरू राहिलं आणि ह्यातच रात्र सरली पण त्या प्रश्नाचं उत्तर काही सापडेना.

कसं सांगू तुम्हाला

अंतरी माझ्या काय चाललंय ?

घुसमटलेले विचार

अन् मन खवळलंय..

सकाळी आजी नेहमीप्रमाणे देव घरात पूजा करत बसल्या होत्या. मी ही देवासमोर हात जोडले. पूजा झाल्यावर आजींनी बनवलेला गरमागरम नाश्ता केला.

“काय रे समीर, कॉलेज कधीपासून सुरू होणार?

“१ तारखेला होणार. तो पर्यंत जरा आराम”

“बरं. मग आज बाहेर जायचं का फिरायला? बघ म्हणजे जर तुला चालत असेल तर”

“अहो का नाही चालणार. नक्कीच चालेल”

“ठरलं तर मग. आज बाहेर फिरू आणि मग बाहेरच जेवू.”

“चालेल”

आम्ही सर्वात आधी सिध्दिविनायक मंदिरात गेलो. तिथून आम्ही मग शिवाजी मंदिरला मस्त नाटक बघितलं. मग तिथून मग आम्ही हॉटेलात जेवलो.

“एक काम करू आता घरी जाऊ आणि मग सायंकाळी शिवाजी पार्काच्या कट्ट्यावर बसू. छान गप्पा मारू”

आजी आज फार उत्साहात आणि आनंदात दिसत होत्या. त्यांना बघून मी ही आनंदात होतो. अर्थात मनाच्या एका कोपऱ्यात ‘रोहन कोण’ हा प्रश्न होताच. असो.

संध्याकाळी ठरल्या प्रमाणे आम्ही पार्कात गेलो. तिथे कट्ट्यावर बसलो.

“कसा होता मग आजचा दिवस? मजा आली का?” आजींनी विचारलं

“आजचा दिवस खरंच खूप अविस्मरणीय होता. जाम धमाल आली”

“छान. मलाही बरं वाटलं. खूप दिवसांनी मी अशी बाहेर आले. पूर्वी खूप फिरायचे पण मग सगळंच बंद झालं”

” आजी एक प्रश्न विचारू?”

“मला माहिती आहे तुला काय विचारायचं आहे ते. तुला वाटलं असेल की मला समजलं नाही पण सकाळपासून तू जरा अस्वस्थ आहेस हे दिसतंय मला. तुझ्या ह्या अस्वस्थेचं कारण काय त्याचा अंदाज आहे मला. तुला हाच प्रश्न पडला आहे ना की हा रोहन कोण आहे?”

“हो. म्हणजे काल तुम्ही म्हणालात की तुम्ही रोहनशी अशाच गप्पा मारायचा. पण मग हा रोहन कोण हे सांगितलं नाही.”

“सांगते..” आजी थोड्या हळव्या झाल्या.

“मी आणि रोहन अशी आमची टीम होती. आम्ही अशाच गप्पा मारायचो. मस्त नाटक सिनेमाला जायचो. फिरायचो. त्याला हे सगळं खूप आवडायचं आणि मलाही. रोहन दिक्षित म्हणजे माझा नातू. छान नातं होतं आमचं. मी ही छान रमायचे त्याच्या सोबत. पण मग त्या काळ्या दिवशी..”

आजी सांगत होत्या आणि तितक्यात माझा फोन वाजला.

रोहन बद्दल सांगताना आजी जरा भावूक झाल्या होत्या.

“२० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सगळं कसं छान चाललं होतं. मी, माझे मिस्टर, मुलगा, सून आणि नातू रोहन. घर अगदी माणसांनी भरलेले असायचे. रोहन तेव्हा पाच वर्षांचा होता. चिमुकल्या पावलांनी घरभर हिंडायचा. बोबड्या आवाजात बोलायचा. आजी..आजी.. करत सारखा अवती भवती फिरायचा. त्याच्या मागे मागे धावताना माझी दमछाक व्हायची खरी पण गंमतही तितकीच यायची. वेळ कसा जायचा हे समजायचंही नाही. आम्ही दोघं खिडकीपाशी बसून गप्पा मारायचो. तो मला कार्टूनच्या गोष्टी सांगायचा तर मी ही त्याला बोध कथा सांगायचे. ते दिवसच वेगळे होते. त्याला कार्टून फिल्मस् खूप आवडायच्या. मग आम्ही असंच बाहेर जायचो. फिल्म बघायचो. हॉटेलात खायचो. इथेच कट्ट्यावर येऊन बसायचो. ही जागा त्याच्या आवडीची होती आणि म्हणूनच माझीही”

आजी सांगता सांगता थांबल्या. त्यांच्या चष्म्यामागून आलेला तो अश्रूचा थेंब खूप काही सांगत होतं. त्यांचं त्यांच्या नातवावर किती प्रेम होतं हेच ह्यातून दिसत होतं.

“आजी मग आता रोहन कुठे असतो? नाही म्हणजे मी इथे आल्यापासून कधी दिसला नाही किंवा कुठला फोन आला नाही म्हणून विचारलं?”

“फोन आला नाही हे खरं आहे पण कधी येणारही नाही हेही तितकंच खरं आहे.”

“का?”

“मला वाटतं उशीर खूप झाला आहे. आपल्याला निघायला हवं.”

“पण आजी…”

“चल म्हटलं ना..”

सिनेमा ऐन रंगात यावा आणि तेव्हाच नेमकी वीज जावी. उत्कंठता शिगेला पोहोचावी आणि गोष्ट अर्धवट राहवी. तसंच काहीशी अवस्था माझी झाली होती. रोहन बाबत उत्कंठता ताणली गेली होती.

आम्ही घरी पोहोचलो. आजी फार काही बोलल्या नाहीत. आपल्या खोलीत शांत बसून होत्या. मीही त्यांना काही विचारायला गेलो नाही. त्या दुखावल्या होत्या हे जाणवत होतं. रोहनचा विषय काढून अजून मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता.

मी ही स्वतःशी ठरवलं की आता जो पर्यंत आजी रोहन बद्दल सांगत नाही तो पर्यंत आपण हा विषयच काढायचा नाही.

दिवसभर आजी सोबत खूप छान वेळ गेला. आईला फोन केला. तिच्याशी दिवसभर घडलेली प्रत्येक गोष्ट शेयर केली. आजींबद्दल सांगत होतो. तिलाही बरं वाटलं ऐकून.

रात्र फार झाली होती . मी खोलीचा दिवा बंद केला. आजींच्या खोलीत डोकावलं तर त्या शांत झोपल्या होत्या. मग मीही झोपलो.

रोहनचा विषय संपला होता माझ्यासाठी पण प्रश्न अनुत्तरीत होताच. रोहन कुठे आहे? आजींचा मुलगा व सून ते कुठे असतील? आजोबा कुठे असतील? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकी माणसं असूनही आजी अशा एकट्याच का? ह्या २० वर्षात असं काय बदललं?

हा विषय संपला असं म्हटलं खरं पण मन हे आपुले. विचार करायचे थोडीच थांबतंय. विचारचक्र सुरूच.

रोहनचा विषय तात्पुरता तरी माझ्यासाठी संपला होता कारण त्यातच अडकून राहिलो तर मुंबईला येण्याचं माझं मूळ उद्दिष्ट बाजूला राहिलं असतं. आजींना हा विषय पुन्हा पुन्हा काढून त्रास द्यायचा नाही किंवा त्यांना दुःख होईल असं काहीही वागायचं नाही असं मी ठरवलं.

सकाळी मी माझं सगळं आवरून खोली बाहेर आलो तेव्हा तिथे आजी बसल्या होत्या. आनंदी दिसत होत्या. स्वतः मधे मग्न होत्या. गाणं गुणगुणत होत्या.

“Good Morning आजी”

“काय मग झोप झाली का छान?”

“हो आजी”

“बरं बस इथे. मी गरम कांदे पोहे केले आहेत ते आणते” असं म्हणत आजी किचनमध्ये गेल्या.

“लिंबू पिळून देऊ का?” आतून आवाज आला.

“हो चालेल”

“आणि खोबरं?”

“थोडं चालेल”

आजी आतून छान गरमागरम कांदे पोहे घेऊन आल्या.

“काय रे ते तुझ्या कॉलेजमध्ये तुला मार्कशीट का काय द्यायचा होत्या असं म्हणाला होतास. ते कधी जाणार आहेस?”

“अरे हो. मी विसरलो होतो. थँक्स आजी आठवण केल्याबद्दल. आजच जाऊन येतो.”

“चालेल. लगेचच करून टाक. अशा महत्त्वाच्या कामात उगाच दिरंगाई नको.”

“हो नक्की.”

पोहे खाऊन झाल्यावर मी लगेचच कॉलेजला जायला निघालो. आजी म्हणाल्या होत्या की नाक्यावरच्या बस स्टॉपवर मला बस मिळेल.

मी बसची वाट बघत उभा होतो. गरमीचे दिवस असल्याने घामाच्या धारा वाहत होत्या.

“वडाळ्याला जायला बस इथेच मिळेल ना?” मी शेजारच्या माणसाला विचारलं.

“होय”

इतक्यात मला बस येताना दिसली. मी त्यात चढलो आणि एक आजोबा बसले होते त्यांच्या बाजूला जाऊन बसलो. अगदी साधी वेषभूषा होती त्यांची.डोळ्यांवर चष्मा. खांद्यावर कापडी पिशवी आणि हातात काही सुंदर चित्र होती.

मला राहावले नाही म्हणून मी सहज त्यांना म्हटले, “आजोबा, ही चित्र कुठून आणली? अप्रतिम आहेत!”

हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. मला म्हणाले, “बाळा ही मी स्वतः काढली आहेत.”

मला आश्चर्याचा धक्का बसला.

“वाह! तुम्ही चित्रकार आहात ? ”

“हो. म्हणजे अगदीच चित्रकार असं नाही पण हौस म्हणून काढतो.”

“क्या बात है”

“तू विचारलं म्हणून सांगतो. लहानपणापासून आवड होती. जगातील प्रसिद्ध चित्रकार व्हायचे स्वप्नं पाहिले होते. परंतु चित्रकाराचे उत्पन्न फार कमी. घरच्या लोकांना ते पसंत नव्हते. त्यांचा विरोध होता. म्हणून इच्छा नसताना देखील इंजिनियर झालो. चांगली नोकरी मिळाली. पुढे लग्न झाले. संसार सुरू झाला. आयुष्याच्या चित्रात रंग भरताना माझी आवड मात्र मागे राहिली.

पैसे आले. चांगले आयुष्य मिळाले परंतु आनंद नाही मिळाला. आज मुलं परदेशी आहेत. सुखी आहेत. पत्नीचे निधन झाले. आज आयुष्याच्या ह्या टप्प्यावर काय मिळालं ह्या पेक्षा माझं स्वप्न अपूर्ण राहिले ह्या गोष्टीचे दुःख जास्त आहे. मनात खंत उरते रे. तुझे काही स्वप्न आहे का? जर असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, स्वतःचे स्वप्न पूर्ण कर. जे आहे ते ह्या जन्मात. एखादी राहून गेलेली गोष्ट पुढच्या जन्मी करीन हे आपल्या अपयशाचे केलेले समर्थन आहे . लक्षात ठेव!”

त्यांच्या डोळ्यात पाणी होते. चष्म्या मागून येणारा तो अश्रूचा थेंब हृदयाला चटका लावणारा होता.

बस थांबली. ते उतरले . मी थक्क होऊन पाहत राहिलो…

बस मधून उतरल्यावर समोरच कॉलेजची इमारत दिसली. इंटरनेट वर फोटो पाहिला होता खरा पण प्रत्यक्षात सुद्धा ती वास्तू तितकीच सुंदर होती.

खरंतर शिक्षणाची आवड मला अगदी लहानपणापासून होती. शाळेत असताना नेहमी चांगले मार्क्स असायचे. देवाच्या कृपेने हुशारही होतो. उच्च शिक्षण घेणं हे माझं स्वप्न होतं.

माझं बालपण हे खरंतर एका छोट्याशा खेड्यात गेलं. घरची परिस्थिती तशी बेताची होती पण आईने झेपेल तसं सगळं केलं. दिवस रात्र राबायची बिचारी. माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च तिने केला. ते कधीच थांबू दिलं नाही. आईने केलेल्या कष्टाची जाणीव मला होती. कॉलेजला जायला लागल्यावर मी सुद्धा एक छोटीशी नोकरी धरली. तिथेच गावातच. पगार काही फार नव्हता पण तेवढीच आईला मदत.

हळूहळू खर्च वाढू लागले. आईच्या ही अवाक्या बाहेर जात होतं सगळं. तिच्या चेहऱ्यावर नेहमीच टेंशन दिसायचं मला. बाकी कसलंही सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग नाही ना घेता येत. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती.

एकदा असंच मी तिला म्हटलं की आता पुढचं शिक्षण नको. त्याचा खर्च वाचेल आणि पूर्ण वेळ नोकरी करता येईल. तेव्हा आई खूप चिडली माझ्यावर आणि म्हणाली “जो पर्यंत तुझी आई जिवंत आहे तो पर्यंत तरी तुला असं काहीही करायची गरज नाही. तुला वाटतं ना की पैशाची जुळवाजुळव करताना मला त्रास होतोय. तर हो..होतोय मला त्रास..पण जर तू शिक्षण सोडलं तर मला होणारा त्रास हा त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल. त्यामुळे पुन्हा कधी शिक्षण सोडण्याची भाषा करायची नाही.”

दिवस सरत होते. आम्ही जगत होतो. माझ्या आईची स्वामींवर फार श्रद्धा होती. ती नेहमी म्हणायची की आपण कष्ट करत रहायचे. स्वामी आपल्याला ह्यातून नक्कीच बाहेर काढतील.

तिचा हाच विश्वास खरा ठरला. ऐके दिवशी मावशीचा फोन आमच्या शेजारच्या घरी आला. तिने आईला सांगितलं की कुठलीतरी जुनी जमीन होती म्हणे वडिलांची त्यांच्या. कित्येक वर्ष अशीच होती. ती विकली गेली ३० लाख रुपयांना आणि त्यातून आलेले पैसे तिघं भावंडं वाटून घेणार. आईच्या वाटेला १० लाख रूपये आले.

आमची परिस्थिती बदलत गेली. आईचा ताण कितीतरी कमी झाला. मेहनत आणि प्रामाणिकपणा असेल तरा नशीब सुद्धा आपलं साथ देतं ह्यावर माझा विश्वास बसला.

हे सगळं सुरू असताना माझं कॉलेज शिक्षण पूर्ण झालं आणि मुंबईच्या कॉलेजात MBA करायचं मी ठरवलं.

आपलं नशीब आपल्या हाती

दोष इतरांना देऊ नका..

आपण घडवू तसंच घडेल आयुष्य

रोष इतरांवर काढू नका..

आमच्या घरात तशी अजून एक व्यक्ती सुद्धा रहायची. सांगायला विसरलो. माझे वडील. पण त्यांच्या बद्दल न बोललेलं बरं..

कॉलेजमध्ये मार्कशीट देऊन मी पुन्हा घरी आलो. आजींशी गप्पा मारत बसलो. मी माझ्या वडिलांविषयी बोलणं टाळतो हे आजींना ही माहित होतं. त्यांनी मला ह्या विषयी एकदा विचारलं होतं पण नंतर पुन्हा कधीही हा विषय काढला नाही. कदाचित जसं मी त्यांना रोहनबद्दल विचारायचं थांबवलं होतं तसंच.

आम्ही वेगळ्या विषयांवर गप्पा मारत होतो. जाताना बसमध्ये भेटलेल्या त्या आजोबांबद्दल सांगत होतो. गप्पांच्या ओघात मी त्यांना म्हटलं की मला लिहायला आवडतं. कविता करतो कधीकधी.

“काय सांगतोस? कविता ?? मला ऐकव की..”

“नाही हो.. येवढं काही चांगलं जमत नाही ”

“असू दे. तरीही ऐकव”

“बरं..”

मी माझ्या कवितांची वही आणली.

आजी मी तुम्हाला ‘माणूस’ ही माझी कविता ऐकवतो. माणूस कसा असावा ह्या संदर्भातील ही कविता आहे.

माणूस

परिस्थितीशी झुंज देणारा

असा माणूस व्हायला हवा..

आसवे गाळावे त्यांनीही

पण मानसिकरीत्या खंबीर हवा..

प्रत्येक प्रश्नांना उत्तर नसले तरीही

शोधायचा त्यांने प्रयत्न करावा..

मनात झालेला विचारांचा गुंता

अगदी अलगद असा सोडवून घ्यावा..

राग आला कितीही तरी

मनात त्याच्या क्रोध नसावा..

कठीण समय आला जरी

चेहरा कायम प्रसन्न असावा..

परिस्थितीशी झुंज देणारा

असा माणूस व्हायला हवा..

आसवे गाळावे त्यांनीही

पण मानसिकरीत्या खंबीर हवा..

“वाह! छान! खरंच आवडली. खूप छान लिहिली आहेस”

“थँक्स आजी”

“अजून एखादी ऐकव ना. आता तर माझ्या अपेक्षा अजून वाढल्या आहेत”

“काहीही काय आजी. उगाच माझी मस्करी करताय का..”

“अरे खरंच मनापासून सांगतेय”

“बरं मग मी अजून एक कविता सादर करतो”

जुनंच आयुष्य नव्यानं जगणं.

जुने रस्ते नव्या वाटा

जुनेच किनारे नव्या लाटा

जुन्या जखमा नवं दुखणं

जुनेच डोळे नवी स्वप्न

जुनी ठेच नव्यानं लागणं

जुनंच आयुष्य नव्यानं जगणं

जुनी वस्तू नवी किंमत

जुनाच खेळ नवी गंमत

जुना झोपाळा नवे झोके

जुनंच घड्याळ नवे ठोके

जुना आशीर्वाद नव्यानं मागणं

जुनंच आयुष्य नव्यानं जगणं

जुनी माणसं नवे छत्र

जुनीच अक्षरं नवी पत्र

जुने पेच नवे प्रसंग

जुन्याच अपेक्षा नवे भंग

जुना स्वभाव नव्यानं वागणं

जुनंच आयुष्य नव्यानं जगणं..

माझ्या कविता ऐकून आजींनी माझं तोंड भरून कौतुक केलं. मलाही खूप बरं वाटलं. दोघे आम्ही खूप आनंदी होतो. गप्पांच्या आणि कवितेच्या नादात मी माझा फोन आत ठेवलाय हे लक्षातच आलं नाही. मी झोपायला गेलो तेव्हा फोन बघितला. त्यावर कुठल्यातरी अनोळखी नंबर वरून १७ मिस्ड कॉल होते. मी चक्रावलो. कुणाचे असतील ? मी पुन्हा फोन लावला त्या नंबर वर तेव्हा फोन लागेना आणि त्या विचाराने मला झोप लागेना.

सकाळ झाली. मी अजूनही त्याच विचारात होतो की मला फोन करणारी व्यक्ती नेमकी कोण असेल?

त्या नंबर वर मी पुन्हा फोन लावला. अजूनही लागला नाही. फोनच्या ॲपवर नंबर शोधला तरी सापडला नाही. कदाचित राँग नंबर असेल म्हणून मी विचार सोडून दिला.

बघता बघता मुंबईत येऊन मला दोन आठवडे झाले होते.आज पासून माझं कॉलेज सुरू होणार होतं. मी निघताना आजींचा आशीर्वाद घेतला अन् निघालो.

रिमझिम पाऊस पडत होता. कॉलेजचा परिसर छान हिरवागार होता. मी बिल्डिंगच्या आत शिरलो आणि माझा वर्ग शोधला. सगळेच नवे चेहरे होते. एक बाक रिकामा दिसला. तिथे जाऊन मी बसलो.

आमचं इंडक्शन सेशन सुरू झालं. प्रत्येक जण आपली ओळख करून देत होते. मी ही दिली. पहिला दिवस असाच गेला. निघताना काही मुलं घोळक्यात उभी होती. नवी नवी मैत्री झालेली पण माझी नजर गेली ती एका मुलावर. तो एकटाच उभा होता.

मी त्याच्या जवळ गेलो.

“हाय.. मी समीर”

“हाय”

“नाव काय रे तुझं?”

“रोहन.. रोहन दिक्षित”

मी हे नाव ऐकून चक्रावलो. हाच का आजींचा नातू? की फक्त नावात साम्य? मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं.


to be continued…


– निनाद वाघ

5+
Posted on

ताळेबंद

6+

श्रीमती क्षमा सुरेश गोसावी. 
वय वर्ष ६२. 

फेब्रुवारी महिन्याची एक तारीख म्हणून आज बँकेत प्रचंड गर्दी. सकाळची ९ वाजायची वेळ. सर्वत्र घाई गर्दीची वेळ ! शाळा, कॉलेज, ऑफिसला जाणाऱ्यांची घाई आणि घरी राहणाऱ्या लोकांची, बाहेर पडणाऱ्या लोकांची सरबराई करण्याची घाई! कोणाचे डबे भर तर कोणाला जेवायला वाढ, कोणाचे शाळेचे दप्तर भर तर कोणाचे कॉलेजचे ओळखपत्र शोधून दे! कोणाच्या घरी कपड्यांचे मशीन लाव तर कोणाचे मार्केटिंग करून येताना बँकेतून पैसे काढून आण! Light Bill भर नाही तर telephone bill भर अशी सर्व कामे घरात असलेली निवृत्त मंडळी करत असतात. आजही तसेच झाले.

जोगेश्वरीच्या एका राष्ट्रीय बँकेत एक तारीख असल्याने मुंगीलाही शिरायला जागा नाही इतकी प्रचंड गर्दी! बँक नऊ वाजता उघडणार तर त्यापूर्वीच भली मोठी रांग अगदी कंपाऊंडच्या बाहेरपर्यंत आलेली होती. सिक्युरिटीने बँकेचे शटर उघडले तेव्हा बँकेचे जवळजवळ सर्व कर्मचारी आपापल्या जागी स्थानापन्न झाले होते. पेन्शनर लोकांची वेगळीच रांग होती. आज तिथे खूपच मोठी रांग होती आणि तिथे काम करणारी सुनिता अजून आली नव्हती. घरातील अडचणींमुळे गेले कित्येक दिवस ती वेळेवर येऊच शकत नव्हती. मग रोज कोणीतरी नविन व्यक्ती त्या काऊंटरवर बसत असे. नऊ वाजून दहा मिनिटे झाल्यावर त्या ब्रांचमध्ये नवीनच बदलून आलेली वर्षा देसाई त्या काऊंटरवर येऊन बसली. इतका वेळ ताटकळत बसलेल्या पेन्शनर्सच्या चेहऱ्यावर आनंद उजळला. रुमालाने घाम पुसत सगळे सरसावून उभे राहिले. आपला नंबर कधी लागतो याची वाट बघत २५-३० लोक आपापले पेन्शन घेऊन बाहेर पडले. रांगेतून बाहेर पडणारे काही लोक कुठे विजय मिळवून परत आलेल्या थाटात तर काही लोक अगदी व्यवस्थितपणे आपल्याबरोबर आणलेल्या पिशवीत पैसे जपून ठेवताना दिसत होते. माधवराव काळ्यांचे लक्ष फक्त आपला नंबर कधी लागतो याकडेच होते. शेवटी एकदाचा त्यांचा नंबर लागला. काऊंटरवरील वर्षाने माधवरावांचे पेन्शनचे १५०० रुपये त्यांना दिले. माधवराव पैसे घेऊन लगोलग बँकबाहेर पडले. घराच्या दिशेने चालू लागले. घर बँकेपासून बरेच लांब असल्याने सुमारे अर्धा पौऊण तास घरी पोहोचायला लागत असे.

दुपारचे दोन वाजून गेले. लोकांसाठीची बँकेची कामकाजाची वेळ संपली. शटर बंद झाले. कर्मचारी वर्गाचा लंच टाईम झाला आणि संपलाही! गप्पा टप्पा करताना लंच घ्यायचा हा सर्व स्टाफचा नियमित कार्यक्रम. नंतर रोजचेच रुटीन काम. सर्व पैशांची झालेली देवघेव, त्यांचे अकाऊंटिंग, पोस्टिंग इत्यादी कामे सर्वांचीच करून झाली होती. वर्षा मात्र बराच वेळ हिशेब लावत होती. उलट सुलट हिशेब करून झाले तरी हिशेब जमत नव्हता. शंभर रुपये तिच्याकडे जास्त जमा होते. चूक शोधून काढायला. वर्षाच्या सहकार्यांनी प्रयत्न केलापण त्यांनाही ते जमले नाही. अखेर sundry deposit मध्ये ती शंभर रुपयाची नोट ठेवली आणि बँकांचे आजचे काम संपले. वर्षा मनाशी म्हणत होती, “किती विचार करू? गेली असेल कुणालातरी एखादी नोट कमी. येईल उद्या मागायला.”

माधवराव बँकेतून बाहेर पडले आणि हळूहळू चालत चालत घरी येऊन पोहोचले तर दुपारचे दिड वाजून गेले होते. घरी गेल्यावर पेन्शनचे पैसे अगदी व्यवस्थित लोखंड पेटीत ठेवले. कपाळावरचा घाम पुसत खुर्चीवर बसले. बसल्या बसल्याच त्यांचा डोळा लागला. रमाकाकू दोन-तीन घरच्या पोळ्या करून आल्या आणि त्यांनी पाहिलं की माधवरावांचा डोळा लागलाय. पटकन त्यांनी पाटपाणी घेऊन येऊन त्यांनी माधवरावांना उठविले. ‘चला हो, पान वाढलंय. खूप वेळ लागला ना बँकेत? दमलाय का हो? आणि घरी येताना बस रिक्षा नसेलच केली. निदान उन्हातून येताना तरी तंगडतोड करू नका कितीवेळा सांगितलाय हो?” आणि अगदी एक तारखेला गेलंच पाहिजे का? पण माझं ऐकतं कोण?” त्या हळूहळू पुटपुटत होत्या तेव्हाच एक जांभई देत पानावर येऊन बसले. आज पानात अगदी वरण भात, भाजी, पोळी, आमटी, कोशिंबीर, लोणचं पापड चारी ठाव पदार्थ होते. रामरावांनी खुश होऊन विचारले, “काय आज काय विशेष? एवढं साग्रसंगीत जेवण?” काही नाही हो, जोशी वहिनींकडे फणसाची भाजी आणी शेंगांची आमटी होती.त्या म्हणाल्या घेऊन जाल का थोडी? म्हणून घेऊन आले. आणि पापड काल विठूला भाजून दिले होते भूक लागली. तेव्हा त्यातलेच दोन राखून ठेवले होते. माधवराव त्यावर काकूंना म्हणाले, “ अग या शेंगा मिठूसाठीच काढून ठेव आणि फणसाची भाजी सुनबाईला आवडते ना खूप? मग तिलाच ठेव. मला थोडीशी चवीपुरती राहू दे.’ रामाकाकुंनी काहीही न बोलता भाजी आमटी काढून ठेवली. माधवराव लोणचं कोशिंबिरीशी जेवले आणि तृप्तीची ढेकर देऊन पानावरून उठले.

संध्याकाळी सायली म्हणजे माधवरावांची सून कामावरून घरी आली. एका प्रायव्हेट शाळेत ती क्लार्कची नोकरी करत होती. शाळा छोटीशीच होती पण कामाचा व्याप मोठा होता. शाळेचे सारेच कामकाज तिला करावे लागत असल्याने घरी आल्यावर तिला काहीच काम करायची ताकद नसे. घरी आली कि नुसती चिडचिड! घरातील सारीच कामे रमाकाकू करत असत. माधवरावांचा मुलगा सुहास याची कंपनी बंद पडल्यामुळे तो ही एखाद्या थातुरमातुर कंपनीत नोकरीला होता. जेमतेम ५००० रुपये त्याचा पगार, सायलीचे २००० रु. आणि माधवरावांचे १५०० रु. एवढीच त्यांची तुटपुंजी मासिक मिळकत. घरात खाणारी तोंडे पाच आणि आवक जेमतेम ८५०० रु. कसे पुरवठ्याला येणार एवढेसे पैसे त्यांच्या प्रपंचाला? रमाकाकू दोन तीन घरच्या पोळ्या करून २००-३०० रु मिळवत असत. पण ते कुठच्या कुठे संपून जात कळतही नसे. दोन खोल्यांच्या टिचक्या घराचे हफ्ते आणि बिले भरून खर्च करायला पैसे उरतच नसत. मग हौस मौज त्यांच्या जीवनात येणार तरी कुठून? नाही म्हणायला माधवरावांना चहाचे तेवढे व्यसन जडले होते. निवृत्तीनंतर आयुष्यातील कडू गोड अनुभव चहाच्या घोटाबरोबर गिळून टाकायला त्यांना चहाची गरज होती. त्यामुळे ती सवय लागली. केतरी दिवस काढत पुढील महिन्याच्या एक तारखेची वाट बघत  सारे जण ढकलत असत. माधवरावांचा उच्च रक्तदाब आणि रामाकाकुंचा मधुमेह जन्मभराचे शत्रू आता मित्र होऊन राहिले होते. त्यांच्यासाठीही काही पैसे ठेवावे लागत. महिना संपत आल्यावर गोळ्या जर संपल्या तर शेवटचा आठवडा औशाधाशिवायच एक तारखेची आशाळभूतपणे वाट बघत काढत असत.

महिना संपला, मार्चची एक तारीख आली. आजही बँकेबाहेर भलीमोठी रांग पेन्शनर्सची! पुन्हा सकाळची नऊची वेळ. शटर उघडल्यावर लोकांचा लोंढा आत घुसला. एखादे धरण फुटून पाणी सर्वत्र पसरावे तसा! आजही माधवरावांचा नंबर २०-२२ वा होता. पण आज विशेष म्हणजे नेहमी काऊंटरवर असलेली सुनिता आज प्रसन्नपणे हसत काऊंटरवर खुश दिसत होती.गेले चार-पाच महिने तिचे चालू असलेले प्रोब्लेम्स बहुदा संपले असावेत. माधवरावांचा नंबर आल्यावर तिने विचारले, “काय काका, कसे आहात? काकू काय म्हणतायेत? सुहास ला लागली का कुठे चांगली नोकरी? आणि हो काकूंना पुढच्या आठवड्यात घरी येऊन जायला सांगा, थोडे काम द्यायचेय त्यांना.” माधवराव फक्त ‘हो’ म्हणाले. आणि सुनिताने दिलेल्या एकेककरून नोटा मोजू लागले. नोटा मोजायला वेळ लागतोय हे पाहून रांगेतील मागचे लोक कुरकुर करायला लागले. “ओ राव किती वेळ लागतोय? आज होणार का नोटा मोजून? आम्हालाही घाई आहे. येत नसेल तर आम्ही देतो मोजून लवकर.” पण लोकांचे शब्द त्यांच्या कानांवर जणू पडतच नव्हते. ते आपले नोटा मोजण्यात दंग होते. शेवटी न राहून सुनितही त्यांना म्हणली, “काका आम्ही नोटा नीट मोजून देतो, शिवाय यांत्रावरही मोजतो म्हणजे त्यात चूक व्हायची शक्यता नाही. कशाला उगीच परत परत मोजता? बाकी लोकांनाही उशीर होतो ना?” शेजारच्या काऊंटरवरील गर्दी कमी झाली होती. तिथे कुणीच उभे नाही हे पाहून त्या काऊंटरवरची वर्षा माधवरावांना म्हणाली, “काका, इथे या आणि मोजा नोटा सावकाश. उगीच बाकीच्यांचा खोळंबा नको व्हायला.” माधवराव आता वर्षाच्या समोर येऊन पुन्हा नोटा मोजू लागले. त्या बरोबर असल्याची खात्री करून घेतली आणि वर्षाला thank you म्हणून ते बाहेर चालू लागले. त्यावेळी वर्षाच्या नजरेतून माधवराव डोळ्यात आलेले पाणी पुसत असल्याचे सुटले नाही. ती काऊंटर सोडून बाहेर आली, माधवरावांना हाक मारून तिने जवळ असलेल्या बाकावर बसवले. “काका, काय होतंय? बरं नाही का? पाणी घ्या” वर्षाने काकांना पाणी दिले. पाणी प्यायल्यावारही काका अस्वस्थच होते. त्यांना गदगदून येत होते. हे पाहून वर्षा त्यांना पुन्हा विचारू लागली. “काका काय झालं, सांगा न मला please.”

माधवराव थोडे शांत झाले आणि बोलू लागले, “ताई गेली ५-७ वर्षे मी इथे येतोय तेव्हापासून मला सर्वजण ओळखतात. तुम्ही माझ्या मुलीसारख्याच आहात. आणि आता एवढं विचारताय म्हणून सांगतो. मागच्या महिन्यात पेन्शन घेऊन घरी गेलो. घाईत काऊंटरवर नोटा मोजून घेतल्या नाहीत. माझाच वेंधळेपणा हो! संध्याकाळी घरी मुलगा आल्यावर त्याच्या हातात पेन्शन ठेवले. त्याने ते मोजून घेतले आणि म्हणाला, “बाबा शंभर रुपये कमी आहेत” मी परत मोजले तर खरंच शंभर रुपये कमी होते. तर माझी सून म्हणजे सायली एकदम चवताळून मुलाला सांगायला लागली की खोटं बोलताहेत हे! १०० रु उडवून आले असतील हे कुठेतरी चांगलं चुंगलं खाऊन! बँकेतून कसे कमी पैसे मिळतील? आता १०० रु कमी आणलेत ना यांचा या महिन्याचा सकाळचा आणि दुपारचा चहा बंद करणार मी!”

माधवराव थरथरत होते. त्यांचे डोळे मात्र आता कोरडे झाले होते. पण वर्षाच्या डोळ्याला मात्र धारा लागल्या होत्या आणि वर्षाला कळून चुकले की मागच्या महिन्यात तिच्याकडे जास्त आलेले, excess आलेले शंभर रुपये खरं तर भावनांच्या deficit मध्ये होते. ऑफिसमधील ताळेबंद जमवता येतो पण ह्या क्षुल्लक वाटलेल्या १०० रुपयासाठी माधवरावांच्या घरचा ताळेबंद कसा जमवला पहा त्यांनी!

श्रीमती क्षमा सुरेश गोसावी.
वय वर्ष ६२.

 

6+